Hingoli Bazar samiti : हिंगोली कृउबासमध्ये आजपासून शेतीमाल खरेदी-विक्री सुरु झाली आहे. मोंढ्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आपल्या हळदीच्या गाड्यांची रांग लावल्याने बाजार समिती परिसरात मोठी गर्दी झाली आहे.
मार्च एन्ड व नाणे टंचाईनंतर
आजपासून हिंगोली कृउबासच्या मोंढ्यात शेतीमाल खरेदीविक्री सुरु;अनेक शेतकरी मुक्कामी
हिंगोली (Hingoli Bazar samiti ) : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (मोंढा) परिसरात मोंढा सुरु होण्यापुर्वीच हळदीच्या तब्बल २०० गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मागील काही दिवसांपासून मोंढ्याला मार्च एन्ड व नाणे टंचाईमुळे सुट्ट्या होत्या.त्यामुळे शनिवार रोजी संध्याकाळपासूनच विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेतकर्यांनी आपली हळद विक्रीसाठी आणून गाड्या रांगेत लावल्या आहेत. मात्र, गेले दोन-तीन दिवस येथे मुक्कामी होते.
चांगल्या भावासाठी विदर्भ-मराठवाड्यातून शेतकर्यांची गर्दी-हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कायम चांगला भाव मिळतो. याच आशेने विदर्भातील यवतमाळ, वाशिम, रिसोड यांसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून शेतकरी आपला शेतमाल घेऊन हिंगोलीत येतात. मध्यंतरी नाणे टंचाई व मार्च एन्डमुळे हिंगोली कृउबासमध्ये शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार ५ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. आज ६ एप्रिलपासून मोंढ्यातील शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार पुर्ववत सुरु होणार आहेत. सध्या आवक वाढल्याने बाजार समिती परिसरात हळदीच्या गाड्यांनी मोठी गर्दी केली आहे.
शनिवारपासून रांगेत असलेल्या शेतकर्यांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बाजार समितीच्या हॉलमध्ये मुक्काम ठोकला आहे. मोरगव्हाण येथील शेतकरी गंगाराम कोकाटे आणि दुसरे शेतकरी पंढरी अवचार यांनी आपली अडचण मांडताना सांगितले की, हळद विक्रीसाठी अनेक शेतकरी दोन-तीन दिवसापासून बाजार समितीत मुक्कामी आहेत. त्यामुळे बाजार समितीने लवकरात लवकर हळदीचे काटे (वजन) सुरू करावेत आणि आम्हाला योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून आमची गैरसोय होणार नाही असे सांगितले.
या सर्व परिस्थितीबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Hingoli Bazar samiti) सचिव मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की, 'बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकर्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारची सुट्टी संपल्यानंतर, सोमवारी या सर्व हळदीच्या गाड्यांचे काटे सुरू केले जातील. शेतकर्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेत काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या नक्कीच तात्काळ पूर्ण केल्या जातील. बाजार समितीत शेतमाल घेऊन येणार्या बळीराजाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही, यासाठी बाजार समिती प्रशासन पूर्णपणे तयार आहे.