बारामती व राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार उतरविण्याची तयारी केली आहे, तर सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देण्याची अपेक्षा होती.
अजितदादा पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घोषित झाली तेव्हा या मतदारसंघातून सुनेत्राताई पवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्या सध्या उपमुख्यमंत्री आहेत; परंतु विधिमंडळाच्या सदस्या नाहीत. त्यामुळे त्यांना पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कोणत्या तरी सभागृहाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. त्यासाठीच त्यांनी बारामतीतून लढण्याचे ठरविले. सुनेत्राताईंनी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने यापूर्वी या मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या शरद पवार गटाने निवडणूक न लढविण्याचे घोषित केले. सुनेत्रताईंना बिनविरोध निवडून द्यावे, असे आवाहनही सुप्रिया सुळेंनी केले होते. इतर पक्षांची या मतदारसंघात फारशी ताकद नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल असेच वाटत होते; परंतु मविआतील अन्य एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने शरद पवार गटाची विनंती धुडकावून लावल्याचे दिसते. या मतदारसंघात फारशी ताकद नसतानाही काँग्रेसने बारामतीत आपला उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बारामतीसोबतच राहुरीचीही निवडणूक होत आहे. राहुरीत भाजपने दिवंगत आमदार कर्डिले यांच्या सुपुत्राला उमेदवारी दिली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील या दोन्ही मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती; परंतु काँग्रेसने मात्र या दोन्ही मतदारसंघात उमेदवार उतरविण्याची तयारी केली आहे. निवडणूक लढविण्याच्या राज्य काँग्रेसच्या निर्णयाला पक्षश्रेष्ठींकडूनही हिरवा कंदील मिळाल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात निवडणूक होणे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे आपले उमेदवार घोषित करण्यापूर्वी काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे बारामतीत काँग्रेसचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल की केवळ काँग्रेसचा हा संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे मात्र निश्चित झाले आहे.