Maharashtra rain warning: मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आठ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत पाऊस पडण्याची दाट शक्यता. नागरिकांना व शेतकर्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले गेले आहे.
हिंगोली (Maharashtra rain warning) : अहिल्यानगर, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, परभणी, पुणे व सातारा या आठ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, असा इशारा मंत्रालय, मुंबई येथून देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या राज्यावर तयार झालेल्या पोषक हवामानामुळे वरील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत जाण्याची शक्यता असून, काही भागांत अचानक पावसाच्या सरी कोसळतील.
या (Maharashtra rain warning) पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा आणि काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा विजेच्या खांबांजवळ उभे राहू नये. पावसासोबत वीज चमकत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी.
महावितरण, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन करावे, असेही कळविण्यात आले आहे. दरम्यान, उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळणार असला तरी शेती व दैनंदिन कामांवर परिणाम होऊ नये यासाठी दक्षता बाळगावी, असे आवाहन मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.