छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेब यांच्या ३७०व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतीनिमित्त आयोजित ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६ आज करवंडनगरीत अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने पार पडला.
शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन;आ. सौ.श्वेता महाले पाटील यांनी मांडल्या विकासाच्या मागण्या
(Karvand Mahotsav 2026) छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेब यांच्या ३७०व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतीनिमित्त आयोजित ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६ आज करवंडनगरीत अत्यंत उत्साहात आणि भव्यतेने पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन भोसले घराण्याचे वंशज तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले.
आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, करवंड गावाला स्वतःचा एक समृद्ध इतिहास आहे. बुलढाणा जिल्ह्याला राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा वारसा जसा लाभला, तसाच राणी गुणवंताबाई साहेब यांचाही वारसा या जिल्ह्याला आणि चिखली तालुक्याला मिळालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी गुणवंताबाई साहेब या करवंडनगरीच्या कन्या होत्या, हे चिखलीकरांचे भाग्य असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन व पुनर्जीवन व्हावे यासाठी मागील ४० वर्षांपासून शिवप्रेमींची मागणी होती. मात्र त्या वेळच्या सरकारांनी आणि लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भावनेकडे दुर्लक्ष केले, कोणतीही संवेदनशीलता दाखवली नाही, असे आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी स्पष्ट केले.
महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवप्रेमींना नवी आशा निर्माण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर शिवप्रेमींनी आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांच्याकडे हा उत्सव आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. काँग्रेसने सत्तेत असताना छत्रपतींचा वारसा पुसण्याचेच काम केले, असे आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी परखडपणे सांगितले.

आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी मागणी हाती येताच तातडीने प्रस्ताव तयार करून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली आणि हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्याची इच्छा त्यांच्यासमोर मांडली. मंत्री शेलार यांच्या सूचनेनुसार विधिमंडळात प्रस्ताव मांडण्यात आला. यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. महेश लांडगे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्याचे आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
विधिमंडळात मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यासाठी संपूर्ण पाठबळ दिले. केवळ त्यांच्याच सहकार्यामुळे आजचा करवंड महोत्सव साकार होऊ शकला, असे आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी सांगितले. या महोत्सवामुळे करवंड गाव आणि शिवछत्रपतींशी असलेल्या या गावाच्या ऐतिहासिक संबंधाची दखल संपूर्ण राज्य आणि देशभरातून शिवप्रेमी घेत आहेत, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी उपस्थित मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. करवंड गावात राणी गुणवंताबाई साहेब यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. आमदार संजय गायकवाड यांनीही विधानसभेत याच मागणीचा पाठपुरावा केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. त्याचप्रमाणे करवंड गावाच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित ५२ बुरुजांच्या प्रतिकृतीही येथे बसवण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली. नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने या मागण्या मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी शिवप्रेमी असण्यासोबतच एक जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याचेही यावेळी सिद्ध केले. ऐतिहासिक सोहळ्याच्या मंचावरच त्यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना, थकित देयके असलेल्या कंत्राटदारांची देयके तातडीने अदा करावीत अशी मागणी अवघ्या ३० सेकंदात करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
मलकापूर रेल्वे स्टेशन या मार्गावरील चिखली-बुलढाणा रस्त्याचा प्रश्न आमदार पाटील यांनी मंत्री महोदयांसमोर रोखठोकपणे मांडला. हा रस्ता अरुंद असून मध्यभागी डिव्हायडर नाही, ऑफिस अवर्समध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे वारंवार अपघात होऊन जीवितहानी होत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांनी या रस्त्यासाठी १,२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून केवळ ९० कोटी रुपयांची हमी राज्य सरकारने घ्यायची आहे. ही हमी घेऊन रस्त्याचे रुंदीकरण त्वरित करावे, अशी मागणी आमदार सौश्वेता महाले पाटील यांनी केली.
आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी यावेळी आणखी दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्याची मागणी केली उदयनगर,तोरणवाडा, असोला,धोत्रा नाईक हा २६ किलोमीटरचा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग तसेच पेन – सावंगी – चिखली – खंडाळा –जाफराबाद हा २९ किलोमीटरचा रस्ता. हे दोन्ही प्रस्ताव तांत्रिक कारणांमुळे मागील दोन-तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. मंत्री महोदयांनी मार्गदर्शन करून ही कामे त्वरित मार्गी लावावीत, अशी विनंती आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केली.
करवंड गावामध्ये अठरापगड जातींचे लोक राहतात. मात्र छत्रपतींचा वारसा पुनर्जीवित करायचा आहे या एकाच भावनेने सर्वांनी एकत्र येऊन या महोत्सवाला भरघोस सहकार्य केले. त्याबद्दल आमदार श्वेता महाले पाटील यांनी करवंड ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
शेवटी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, करवंड महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, समस्त ग्रामस्थ आणि बुलढाणा जिल्ह्यातून आलेल्या सर्व शिवप्रेमींचे हार्दिक आभार मानले व अभिनंदन केले.
ऐतिहासिक करवंड महोत्सव २०२६ने करवंडनगरीला राज्यस्तरीय ओळख मिळवून दिली असून महाराणी गुणवंताबाई साहेब यांचा गौरवशाली वारसा जपण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आज उचलले गेले आहे...
या महोत्सवास आमदार संजय गायकवाड, आमदार धीरज लिंगाडे, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार रेखाताई खेडेकर, माजी आमदार विजयराज शिंदे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे, चिखलीचे नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख, राणी गुणवंताबाई साहेब यांचे वंशज हरी रुद्र प्रताप रुद्र इंगळे, तसेच सुधीर खांदे, शरद पाटील, ओमसिंग राजपूत, विजय सवडे, समाधान वाघ, राजे विजयसिंह जाधव, अनिकेत नाईक राजे निंबाळकर यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.