मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे एका २६ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण उघडकीस येताच खळबळ उडाली आहे.
सोलापूर (Domestic Violence) : मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे एका २६ वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण उघडकीस येताच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र शवविच्छेदन अहवालातून गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने धक्कादायक वास्तव समोर आले. या प्रकरणी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत विवाहितेचे नाव सोनाली प्रतीक शिंदे असे आहे. तिच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले.
बनाव उघड; पोस्टमार्टममुळे सत्य समोर
रविवारी (१२ एप्रिल) सकाळी प्रतीक शिंदे याने सासरे दत्तात्रय सुरवसे यांना फोन करून, “मी आणि सोनाली रात्री ११ वाजता झोपलो होतो, पण सकाळपासून ती उठत नाही,” असा दावा केला. घाबरलेल्या पालकांनी तिला तातडीने दवाखान्यात नेण्यास सांगितले. मात्र, मोहोळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सोनालीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सुरुवातीला हा प्रकार नैसर्गिक मृत्यू असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, लेकीचे पार्थिव पाहिल्यानंतर वडील दत्तात्रय सुरवसे यांना संशय आला. त्यांनी तातडीने मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या अहवालात गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाल्याने संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले.
क्षुल्लक कारणांवरून छळ; अखेर भीषण शेवट
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात टीव्ही, फ्रिज न दिल्याची खंत, मानपानाचा मुद्दा आणि माहेरहून पैसे आणण्याचा दबाव अशा किरकोळ कारणांवरून सोनालीचा सतत छळ केला जात होता. या छळाचा शेवट थेट तिच्या हत्येने झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पती-सासू अटकेत; न्यायालयीन कारवाई
या प्रकरणी दत्तात्रय खंडू सुरवसे (रा. कोर्टी, ता. पंढरपूर) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पती प्रतीक अनंत शिंदे (वय २६) आणि सासू भामाबाई शिंदे (वय ४७) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील करीत आहेत. घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.