मुंबई जितकी संधींची नगरी आहे, तितकीच तिची एक कठोर आणि वास्तववादी बाजूही आहे.
मुंबई (Concert Incident) : मुंबई जितकी संधींची नगरी आहे, तितकीच तिची एक कठोर आणि वास्तववादी बाजूही आहे. येथे प्रचंड लोकसंख्येमुळे झोपडपट्ट्या, महागडे राहणीमान आणि घरांच्या टंचाईसारख्या समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अनेक लोक चांगल्या आयुष्याच्या आशेने येतात, पण त्यांना बेरोजगारी, कमी पगार आणि स्पर्धेचा प्रचंड ताण सहन करावा लागतो. काही ठिकाणी गुन्हेगारी, फसवणूक आणि शोषणाच्या घटना देखील समोर येतात. वेगवान जीवनशैलीमुळे ताणतणाव, एकटेपणा आणि मानसिक दबावही वाढतो. त्यामुळे मुंबई स्वप्न पूर्ण करणारी असली तरी त्या स्वप्नांसाठी मोठी किंमतही मोजावी लागते.
मुंबई जितकी चांगली आहे, तितकेच तिचे नकारात्मक बाजू देखील आहे. हि नकारात्मक बाजू लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थांचे सेवन (ड्रग्जचं सेवन ) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. या कार्यक्रमादरम्यान ड्रग्जचा अतिरेक झाल्यामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईसारख्या महानगरात अशा प्रकारची घटना घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, अशा गोष्टी कशा घडतात याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
नेमकी घटना काय?
उपलब्ध माहितीनुसार, संबंधित म्युझिक कॉन्सर्टमध्ये उच्चभ्रू तरुण-तरुणींसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सुमारे ३ ते ४ हजार तरुण-तरुणी आणि विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यापैकी काहींनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याची माहिती पुढे आली आहे. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला. हे दोघेही मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच आणखी एका विद्यार्थिनीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांची कारवाई
या घटनेची गांभीर्याने दखल घेत गोरेगावच्या वनराई पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सनी जैन, बालकृष्ण कुरुप, रौनक खंडेवाल, आनंद पटेल, प्रतिक पांडे आणि आकाश समल यांचा समावेश आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आयोजकाचाही सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत विद्यार्थ्यांचे रक्तनमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांची प्रतिक्रिया
या घटनेबाबत पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी माहिती देताना सांगितले की, कार्यक्रमादरम्यान तीन जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, एकावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय स्तरावर प्रतिक्रिया
या घटनेवर विविध राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित करत, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत असताना अशा रेव्ह पार्टींना परवानगी कशी दिली जाते, असा सवाल उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत, प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेसमोर सत्य मांडावे, अशी मागणी केली.
सरकारची भूमिका
दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्य सरकार प्रत्येक घटनेकडे संवेदनशीलतेने पाहत आहे. ड्रग्ज तस्करीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मजबूत यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कोणत्याही मार्गाने येणारे अंमली पदार्थ पकडले जातील आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण घटनेमुळे मुंबईत ड्रग्जच्या वाढत्या प्रभावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.