अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
बारामतीत बिनविरोधचे प्रयत्न; ठाकरे गटाचा पाठिंबा कोणाला?
पुणे (Baramati By Election) : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार स्वतः विविध पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत. निवडणूक एकमताने पार पाडण्याच्या उद्देशाने त्यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनाही संवादासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून पाठिंब्याची विनंती केल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या संवादानंतर ठाकरे गटाकडून सकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत ठाकरे गटामध्ये चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने जर या निवडणुकीत स्वतःचा उमेदवार उभा केला, तर ठाकरे गटाकडून काँग्रेसऐवजी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
ठाकरे आणि पवार कुटुंबातील दीर्घकाळाचे स्नेहसंबंध लक्षात घेतल्यास, या समीकरणाला अधिक बळ मिळत असल्याचे मानले जाते. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये समन्वयाने निर्णय घेण्याचे संकेत मिळत आहेत. या जागेसाठी तिन्ही पक्ष एकत्रित रणनीती आखण्याच्या तयारीत असून येथे निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे.
दुसरीकडे, बारामतीत काँग्रेसनेही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि रासप यांच्यासोबत युती करून बारामतीचा गड राखण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला असून, काँग्रेसला साथ द्यायची की सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा, याबाबत विचारमंथन सुरू आहे.
या सर्व घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणूक केवळ स्थानिक राहिली नसून राज्याच्या राजकारणातही महत्त्वाची ठरत आहे. पुढील काही दिवसांत होणारे निर्णय आणि आघाड्यांचे समीकरण यावर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.