Adarsh Nari honor ceremony: लातूर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी उत्सवासाठी आयोजित आदर्श नारी सन्मान सोहळ्यात, भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी नारीशक्ती, स्वाभिमान व नैतिकता
आदर्श नारी सन्मान सोहळा उत्साहात
लातूर (Adarsh Nari honor ceremony) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आपल्या प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कार्य आणि विचार केवळ स्मरणात ठेवून चालणार नाही, तर ते आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे. आपण अहिल्यादेवींचे वंशज, स्वाभिमान व नैतिकतेचा वारसा जपण्याचे आवाहन भाजप (MLA Gopichand Padalkar) आ. गोपीचंद पडळकर यांनी केले.
भारतीय संस्कृती, समाजकारण आणि स्त्रीशक्तीचा गौरव करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मउत्सवानिमित्त लातूर येथील पार्वती मंगल कार्यालयात शनिवारी (ता. २३) रोजी आदर्श नारी सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि भारदस्त वातावरणात पार पडला. या (Adarsh Nari honor ceremony) कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या आमदार पूजा पाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे नेते तथा जतचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) होते. मुख्य सत्कारमूर्ती म्हणून उत्तर प्रदेशच्या आमदार पूजा पाल उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भारतीय किसान युनियनचे प्रदेश प्रवक्ता राजकुमार सस्तापुरे होते.
समाज बांधवांना मार्गदर्शन करताना पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी उपस्थित सर्वांना मध्यप्रदेशातील महेश्वर, इंदोर आणि महाराष्ट्रातील चौंडी या ऐतिहासिक ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे स्मरण कायम ठेवले पाहिजे. समाज बांधवांनी स्वाभिमान, नैतिकता, प्रामाणिकपणा आणि निष्ठा या मूल्यांची जपणूक करून समाजाची मान उंचावेल असे कार्य करावे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी मी सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. माझ्यासाठी माझा समाज सर्वतोपरी आहे. समाजाचे प्रश्न सुटणे ही माझी प्राथमिकता आहे आणि त्यानंतरच इतर प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.

समाज हितासाठी आणि आरक्षणाच्या लढाईसाठी आपण पूर्ण निष्ठेने आणि ठामपणे लढत असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या सोहळ्यात परंपरागत पद्धतीने आ. पूजा पाल यांचा फेटा, घोगडी, काठी, अहिल्यादेवींची चांदीची मूर्ती, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
आ. पूजा पाल म्हणाले की, माता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याण आणि महिला सक्षमीकरणाचा जो आदर्श घालून दिला, तो आजही महिलांसाठी मार्गदर्शक आहे. धनगर समाज बांधवांनी आणि विशेषतः महिलांनी शिक्षण आणि संघर्षाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करावी. अहिल्यादेवी केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या एक कुशल प्रशासक आणि समाजसुधारक होत्या. न्यायप्रियता आणि प्रजेच्या हितासाठी त्यांनी दिलेला लढा आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक महिलेची आहे. केवळ कुटुंबाची जबाबदारी पेलणे म्हणजे जीवन नव्हे, तर समाजात स्वतःचे स्थान निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आजच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. धनगर समाजातील महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून, आपल्या हक्कांच्या आणि अधिकारांच्या जाणीवेतून एक नवी क्रांती घडवून आणावी. समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट असणे गरजेचे आहे. जेव्हा समाजातील महिला प्रगती करतात, तेव्हाच पूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास होतो. त्यांनी स्वतःच्या राजकीय संघर्षावरही भाष्य केले. कठीण प्रसंगात डगमगून न जाता धैर्याने उभे राहणे हीच खरी नारीशक्ती आहे, असे त्या म्हणाल्या.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रवीण कुमार जरीयाल, माऊली हळणकर, गणेश हाके, प्रभावती के. आर., शशिकांत तरंगे आदींनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे आजही समाजव्यवस्थेसाठी दीपस्तंभ आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू केवळ सत्कार करणे हा नसून, समाजातील स्त्रिशक्तीचा सन्मान करून सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हा आहे. अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजाने संघटित होण्याचे आवाहनही मान्यवरांनी केले. या सोहळ्याला जम्मू-काश्मीरचे भाजप एसटी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीणकुमार जरीयल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरगे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणकर, कर्नाटकच्या कुरुबा संघ महिला प्रदेशाध्यक्ष प्रभावती के. आर., शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन दाणे आदी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या (Adarsh Nari honor ceremony) कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार सस्तापुरे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश बेळंबे यांनी तर आभार प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमाकांत भंडारे, धनुष्य टिळे, प्रा. डॉ. धुळेकर, उद्योजक हरिभाऊ काळे, सूर्यकांत भोसले, झटिंग (अण्णा) म्हेत्रे, बालाजी लव्हे, श्याम माने, सदाशिव अभंगे, सीए बालाजी माने, भीमसेन म्हेत्रे, राजेश पाटील, विनोद पांढरे, बापू मदने, निर्भय कोरे, महादेव नागमोडे, शिवाजी शेळके, धनाजी भंडारे, गोपीनाथ भोकरे, प्रा. डॉ. सतीश शेळके, प्रा. हनुमंत वागलगावे, वसंत कंदगुळे आदी संयोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळ्यासाठी मराठवाडा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने नागरिक व समाजबांधव उपस्थित होते.