MLA Sanjay Gaikwad: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. राज्यभरात संताप उसळला आहे, परंतु नांदेडमध्ये विरोधी पक्ष सुस्त.
राज्यात संतापाची लाट, पण नांदेडचे विरोधी पक्ष सुस्त!
-पवन जगडमवार
नांदेड (MLA Sanjay Gaikwad) : बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा एका गंभीर वादामुळे चर्चेत आले आहेत. 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांना फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी दिली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना, नांदेडमधील विरोधी पक्षांच्या भूमिकेवर मात्र आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कोल्हापूर येथील प्रकाशक प्रशांत आंबी (Prashant Ambi) यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकाच्या शीर्षकावरून संतापलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी आंबी यांना फोन केला. या संभाषणादरम्यान आमदारांनी (MLA Sanjay Gaikwad) अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन आंबी यांच्या कुटुंबातील महिलांविषयी अश्लील भाष्येत शिवीगाळ आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या धमकीमध्ये त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संदर्भ दिला. काॅम्रेड गोविंद पानसरेंचे काय हाल झालेत हे माहिती नाही का?"अशा शब्दांत त्यांनी आंबी यांना धमकावले. गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधन करणाऱ्या या पुस्तकाच्या निमित्ताने थेट हत्येची धमकी देणे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने करून संजय गायकवाड यांची (MLA Sanjay Gaikwad) आमदारकी रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र, एकेकाळी चळवळींचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेससह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख विरोधी पक्ष या प्रकरणावर गप्प आहेत.नांदेडमधील विरोधी पक्षासह परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते केवळ व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर मेसेज टाकून संताप व्यक्त करत आहेत, परंतु रस्त्यावर उतरून किंवा प्रशासनाला निवेदन देऊन आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी अद्याप एकाही नेत्याने आंदोलनासाठी पाऊल उचललेले नाही, ज्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
ज्या जिल्ह्याने नेहमीच पुरोगामी आणि वैचारिक चळवळींना साथ दिली, तो नांदेड जिल्हा अशा गंभीर विषयावर गप्प का? असा प्रश्न विचारला जात आहे. या बातमीमुळे तरी नांदेडच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना जाग येईल का? ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार का? की शांत राहून या '' अशा प्रकाराला मूक संमती देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.