Warood Samand Thieves: सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावात लग्नाच्या आनंदात असताना एका कुटुंबावर चोरीचे संकट कोसळले.
हिंगोली (Warood Samand Thieves) : सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावात लग्नाच्या आनंदात असताना एका कुटुंबावर चोरीचे संकट कोसळले. गुरुवारी ता. १४ रोजी सायंकाळी गावातच पार पडणार्या विवाह सोहळ्यासाठी गजानन पवार हे कुटुंबासह घराला कुलूप लावून गेले होते. साडेसहा वाजताच्या सुमारास घर बंद करून निघालेल्या पवार कुटुंबाच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी घरावर डाव साधला.
चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील साहित्याची नासधूस केली. कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अंदाजे २ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. (Warood Samand Thieves) रात्री साडेसातच्या सुमारास पवार कुटुंब लग्नाहून परतले तेव्हा घराचे तुटलेले कुलूप पाहून त्यांना धक्काच बसला. आत जाऊन पाहिले असता सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि कपाटातील ऐवज गायब झाल्याचे लक्षात आले.
घटनेची (Warood Samand Thieves) माहिती मिळताच पवार यांनी तात्काळ नर्सी नामदेव पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे आणि जमादार खंडेराव नरोटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी तपासासाठी श्वान पथकालाही पाचारण केले, मात्र चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. ठसे तज्ञांनी घटनास्थळावरून काही ठशांचे नमुने गोळा केले आहेत. लग्नाच्या धामधुमीत घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अद्याप नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नाही.