आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह हा आजार केवळ प्रौढांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर लहान मुलांमध्येही झपाट्याने वाढत आहे. विशेषतः 'बाल मधुमेह' म्हणजेच टाइप-१ मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे. या प्रकारात मुलांच्या शरीरात इन्सुलिन तयार होत नाही आणि त्यांना आयुष्यभर इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागते.
बाल मधुमेह झालेल्या मुलांचे जीवन इतर मुलांपेक्षा वेगळे असते. त्यांना रोज इन्सुलिन घेणे, रक्तातील साखरेची तपासणी करणे, आहारावर नियंत्रण ठेवणे आणि नियमित डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक असते. शाळेत, खेळताना किंवा प्रवासातही त्यांना सतत सावध राहावे लागते. यामुळे अनेक वेळा मुलांवर मानसिक ताण येतो आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. भारतामध्ये बाल मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे, जे चिंतेचे कारण आहे. पूर्वी हा आजार मुख्यतः प्रौढांमध्ये आढळत होता, पण आता लहान मुलांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे समाजात याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पुरस्कारांनी सन्मानित, मधुमेह संशोधक डॉ.रवींद्र नांदेडकर यांनी 'मधुमेह मुक्त भारत अभियान' सुरू केले आहे. या अभियानाचा उद्देश केवळ जनजागृती करणे नसून, मधुमेही रुग्णांना प्रत्यक्ष मदत करणे हा आहे. या अभियानाअंतर्गत त्यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे - 'बाल मधुमेही दत्तक योजना'.
या योजनेअंतर्गत टाइप-१ मधुमेह असलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना मोफत उपचार, औषधे आणि मार्गदर्शन दिले जाते. २६ जानेवारी २०१६ रोजी या योजनेची सुरुवात झाली आणि सुरुवातीला ६७ बाल रुग्णांना दत्तक घेण्यात आले. आज या योजनेअंतर्गत देशभरातील हजारो मुलांना दर महिन्याला मोफत औषधे, डॉक्टरांचा सल्ला आणि काउन्सेलिंग दिले जाते. 'विशेष म्हणजे या मुलांना १८ वर्षांपर्यंत मोफत औषध उपचार आणि डॉक्टर कन्सल्टिंग मदत दिली जाते.
या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांना मोठा आधार मिळतो. बाल मधुमेह हा खर्चिक आजार असल्यामुळे अनेक कुटुंबांना उपचार करणे कठीण जाते. अशा वेळी ही दत्तक योजना त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरते.
बाल मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, वेळेवर औषधोपचार आणि मानसिक आधार अत्यंत गरजेचा आहे. यासाठी कुटुंब, शाळा आणि समाज यांची भूमिका महत्त्वाची आहे. मुलांना समजून घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
एकंदरीत, बाल मधुमेह ही केवळ वैद्यकीय समस्या नसून सामाजिक जबाबदारी आहे. 'मधुमेह मुक्त भारत अभियान' आणि बाल मधुमेही दत्तक योजना यांसारखे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. योग्य जागरूकता आणि सहकार्य मिळाले तर आपण निश्चितच निरोगी आणि मधुमेहमुक्त भारत घडवू शकतो.
प्रमोद रत्नप्रभा रामकृष्ण निर्मळ
स्वास्थ्य प्रचारक, मधुमेह मुक्त भारत अभियान
पथ्रोट, ता.अचलपूर, जि. अमरावती
मो.नं.-९४२०७९८००३