Hingoli seasoned farmer: हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी 45 लाख रुपयांची मदत राज्य शासनाने मंजूर केली.
हिंगोली (Hingoli seasoned farmer) : मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यासाठी 45.03 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महसूल व वन विभागाने 18 मे 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.
राज्यात मार्च 2026 मध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाला होता. या (Hingoli seasoned farmer) नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शासनाने एकूण 164 कोटी 83 लाख 44 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनी 5 मे 2026 रोजी सादर केलेल्या प्रस्तावानुसार हिंगोली जिल्ह्यात 498 शेतकरी बाधित झाले असून 260.78 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याच नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी 45.03 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे.
शासन निर्णयानुसार ही मदत DBT पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. एका हंगामात एक वेळेस विहित दराने ही मदत दिली जाणार असून, दुबार मदत होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच मंजूर निधी इतर कारणांसाठी वळती करता येणार नाही, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकूण 6 कोटी 82 लाख 22 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यामध्ये हिंगोली, नांदेड, धाराशिव, जालना व लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक नुकसान नाशिक विभागात नोंदवले गेले असून तेथे 145 कोटी 87 लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे.