लष्करप्रमुख म्हणाले, “जर पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत राहिले आणि भारताच्या विरोधात कारवाया करत राहिले, तर त्यांना ठरवावे लागेल की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा.”
पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि भारताविरोधातील कारवाया सुरूच ठेवल्यास त्यांना “भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा, हे ठरवावे लागेल,” असा थेट आणि कडक इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे.
दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे ‘युनिफॉर्म अनव्हेल्ड’तर्फे आयोजित ‘सेना संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास भारतीय लष्कराची भूमिका काय असेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानला थेट संदेश दिला.
ते म्हणाले, “जर पाकिस्तान दहशतवाद्यांना संरक्षण देत राहिले आणि भारताविरोधातील कारवाया सुरूच ठेवल्या, तर त्यांना ठरवावे लागेल की त्यांना भूगोलाचा भाग राहायचे आहे की इतिहासाचा भाग व्हायचे आहे.”
लष्करप्रमुखांच्या या विधानातून सीमापार दहशतवादाविरोधात भारताची कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर काही दिवसांतच त्यांनी हे वक्तव्य केले.
गेल्या वर्षी ७ मे रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून प्रत्युत्तरात्मक कारवाया करण्यात आल्या. परिणामी दोन्ही देशांमध्ये जवळपास ८८ तास तणावपूर्ण लष्करी संघर्ष सुरू होता.
अखेरीस १० मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये सामंजस्य निर्माण झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, जनरल द्विवेदी यांच्या ताज्या वक्तव्यामुळे भारताने दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश पाकिस्तानला दिला आहे.