महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मुंबई (Vidhan Parshid Election 2026) : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकृतरीत्या उमेदवारांची घोषणा केली. यावेळी महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेसाठी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. यासोबतच राज्यसभेसारखी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, अशीही मागणी काही नेत्यांकडून होत होती. तर नीलम गोऱ्हे यांच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेतील काही नेत्यांकडून विरोध असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र हा विरोध झुगारून एकनाथ शिंदे यांनी दोघांनाही उमेदवारी दिली.
शिंदेंची प्रतिक्रिया
उमेदवार जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, पदे मर्यादित असतात, मात्र इच्छा अनेकांची असते. माझं प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष असतं. जो काम करतो तोच पुढे जातो. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, मालकांचा नाही. गोरगरीबांसाठी लढणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. दिव्यांगांसाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. तुम्ही आधीपासूनच शिवसैनिक आहात, असे सांगत शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर
या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजप उमेदवार:
सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव
शिवसेना शिंदे गट:
नीलम गोऱ्हे, बच्चू कडू
राष्ट्रवादी (अजित पवार गट):
झिशान सिद्दीकी
शिवसेना ठाकरे गट (महाविकास आघाडी):
अंबादास दानवे
निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना : 23 एप्रिल 2026
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 30 एप्रिल 2026
छाननी : 2 मे 2026
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 4 मे 2026
मतदान : 12 मे 2026 (सकाळी 9 ते संध्याकाळी 4)
मतमोजणी : 12 मे 2026 (संध्याकाळी 5 वाजता)
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख : 13 मे 2026
या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि विरोधकांमध्ये चुरस वाढली आहे.