महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर होताच वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
वर्धा (Vidhan Parishad Election) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर होताच वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच संबंधित भागात आचारसंहिता लागू झाली असून इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
या मतदारसंघातून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेमधील निवडून आलेले सदस्य मतदान करतात. आवश्यक मतदारांचा ८५ टक्के कोटा पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २५ मे रोजी अधिसूचना जारी होणार असून १ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख राहणार आहे. १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
या मतदारसंघाचा राजकीय इतिहासही महत्त्वाचा मानला जातो. सुरुवातीला वर्धा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्याचाही समावेश होता. १९८२ ते १९८८ या काळात माजी आमदार जगन्नाथराव डांगे यांनी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९८८ ते १९९४ दरम्यान वसंतराव वानखेडे सदस्य होते. १९९४ ते २००० आणि पुन्हा २००० ते २००६ या सलग दोन कार्यकाळात रामदास तडस यांनी प्रतिनिधित्व करत विक्रम नोंदविला. त्यानंतर जयुद्दीन झवेरी, नितेश भांगडिया आणि शेवटी रामदास आंबटकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
दरम्यान, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित राहिल्याने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडली होती. आता निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवार यांचे नाव चर्चेत असून खासदार धानोरकर गटाकडून वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष एहतेश्याम अली यांच्या नावासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपकडूनही नागपूरच्या एका उद्योजकाचे नाव चर्चेत आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लागली की नगरपरिषद, नगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून सदस्यांच्या भेटीगाठी आणि संपर्क मोहिमांना वेग आला आहे.