धाराशिव जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी एक आगळावेगळा आणि चर्चेचा निर्णय घेण्यात आला आहे.
धाराशिवमध्ये ‘स्टडी टाइम’ नियम
धाराशिव (Study Time Rule) : धाराशिव जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी एक आगळावेगळा आणि चर्चेचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या स्क्रीन टाइममुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने आता ठोस पाऊल उचलले आहे. त्यानुसार, दररोज रात्री ७ ते ९ या वेळेत टीव्ही बंद ठेवून विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी हा उपक्रम जाहीर करताना त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विशेष नियोजनही केले आहे. गावागावात रात्री नेमके ७ वाजता मंदिर किंवा ग्रामपंचायत परिसरात बसवलेल्या भोंग्यांद्वारे संकेत दिला जाणार आहे. हा भोंगा वाजल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची वेळ सुरू झाल्याचे मानले जाईल. यानंतर कुटुंबांनी टीव्ही बंद करून मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे, असा या मोहिमेचा उद्देश आहे.
गावागावात अभ्यासिका व शिक्षकांचीही व्यवस्था
या निर्णयाची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात व्हावी, यासाठी प्रशासनाने विशेष पथके तयार करण्याचे ठरवले आहे. शिक्षण विभागातील अधिकारी, ग्रामसेवक आणि इतर स्थानिक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ही पथके रात्रीच्या वेळेत गावात फेरफटका मारतील. घराघरात जाऊन टीव्ही बंद आहे का आणि विद्यार्थी अभ्यास करत आहेत का, याची पाहणी केली जाईल. यामुळे या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘टीव्हीपासून दोन तास दूर रहा’ अर्चना पाटील यांचे आवाहन
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळावे, यासाठी पूरक उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्यात येणार असून, शाळेनंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी शिक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढवणे, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा सहभाग आणि यशाचे प्रमाण वाढवणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
अर्चना पाटील यांनी पालकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. “मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवसातील दोन तास टीव्हीपासून दूर राहणे गरजेचे आहे. हे केवळ प्रशासनाचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या निर्णयाचे काही स्तरांवर स्वागत होत असले तरी, घराघरात टीव्ही बंद ठेवण्याच्या सक्तीबाबत काही प्रश्न उपस्थित होत आहेत. या उपक्रमाला नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो आणि तो प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.