आजच्या काळात लग्नसमारंभ म्हटले की दिखावा, खर्च आणि पारंपरिक भेटवस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसून येतो.
चिखली (Social Initiative Wedding) : आजच्या काळात लग्नसमारंभ म्हटले की दिखावा, खर्च आणि पारंपरिक भेटवस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर दिसून येतो. मात्र या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर उर्फ दासा पाटील यांनी आपल्या मुलीच्या लग्नात समाजाभिमुख आणि विचारप्रवर्तक असा उपक्रम राबवत एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या अभिनव आणि धाडसी निर्णयाचे शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनी मनापासून कौतुक केले.
दि. ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या डॉ. प्रीती व डॉ. हर्षद यांच्या विवाह सोहळ्यात दासा पाटील यांनी पारंपरिक साडी-चोळी, भेटवस्तू किंवा दिखाऊ खर्च यांना पूर्णपणे फाटा देत “ज्ञानाची भेट” हा विचार पुढे रेटला. वऱ्हाडात आलेल्या महिलांना सुमारे 3 लाख रुपयांचे दर्जेदार आणि उपयुक्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या पुस्तकांमध्ये संत साहित्य, संविधान, ग्रामगीता, तसेच समाजप्रबोधन करणाऱ्या विविध विषयांचा समावेश होता. याशिवाय उपस्थित मान्यवरांनाही पुस्तके देऊन ज्ञानप्रसाराचा व्यापक संदेश देण्यात आला.
या उपक्रमामुळे लग्नसोहळ्याला केवळ उत्सवाचे स्वरूप न राहता समाजजागृतीची दिशा मिळाली. उपस्थित पाहुण्यांमध्येही या उपक्रमाची मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून अनेकांनी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याची इच्छा व्यक्त केली. खर्चिक आणि दिखाऊ परंपरांपेक्षा समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा संदेश या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचला.
या अभिनव उपक्रमाची दखल घेत प्रकाशभाऊ पोहरे यांनी दि. ५ एप्रिल रोजी वरखेड येथील दासा पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी नवविवाहित दांपत्याला आशीर्वाद देत दासा पाटील यांच्या सामाजिक जाणीव आणि दूरदृष्टीचे कौतुक केले. “समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर अशा उपक्रमांची गरज आहे. लग्नासारख्या समारंभातूनही समाजप्रबोधनाचा संदेश देता येतो, हे दासा पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी देविदास कणखर डॉक्टर हर्षद, डॉक्टर प्रीती, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. अकोल्याहून आलेले किसान ब्रिगेडचे विविध पदाधिकारी, समाधान कणखर, समाधान सुपेकर यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक करत दासा पाटील यांच्या विचारांना समर्थन दर्शवले.
दासा पाटील यांच्या या उपक्रमामुळे लग्नसमारंभ हा केवळ एक कौटुंबिक कार्यक्रम न राहता समाजाला दिशा देणारा, विचार देणारा आणि प्रेरणा देणारा ठरला आहे. ज्ञानरूपी भेटवस्तूंच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा हा उपक्रम भविष्यात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
‘पुस्तकांची देवाण-घेवाण; साहित्याची मेजवानी’
लग्नसोहळ्याच्या निमित्ताने भेटीत ज्ञानाच्या देवाण-घेवाणीचा अनोखा क्षण अनुभवायला मिळाला. यावेळी दासा पाटील यांनी लग्न समारंभात वाटप करण्यात आलेली सर्व पुस्तके शेतकरी नेते तथा दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांना सप्रेम भेट दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रकाशभाऊ पोहरे यांनी स्वतः लिहिलेले शेतकरी विषयक साहित्य वधू-वरांसह उपस्थित शेतकऱ्यांना भेट देत या उपक्रमाला अधिक अर्थपूर्ण स्वरूप दिले. एकंदरीतच, लग्नाच्या या प्रसंगी केवळ शुभेच्छांची देवाण-घेवाण न होता विचारांची, ज्ञानाची आणि साहित्याची समृद्ध मेजवानी अनुभवायला मिळाली. पारंपरिक भेटींऐवजी पुस्तकांच्या माध्यमातून घडलेली ही देवाण-घेवाण उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.