अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली परिसरात विषारी सापाच्या दंशामुळे १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली
क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न अधुरे
अहेरी (Snake Bite Tragedy) : तालुक्यातील रेपनपल्ली परिसरात विषारी सापाच्या दंशामुळे १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आयान बबलू शेख (वय १६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयान हा आलापल्ली येथील ग्लोबल मीडिया शाळेत शिक्षण घेत होता. यावर्षी तो नववीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या आयानला शाळेत टॉपर म्हणून ओळखले जात होते. सध्या उन्हाळी सुट्टीनिमित्त तो गावाकडे आला होता.
सोमवारी सकाळी तो तेंडूपत्ता तोडण्यासाठी जंगल परिसरात गेला होता. रात्री घरी परतल्यानंतर तो गाढ झोपेत असताना रात्री अंदाजे १ वाजताच्या सुमारास विषारी सापाने त्याला दंश केला. सुरुवातीला साप चावल्याची बाब लक्षात न आल्याने उपचारासाठी नेण्यात उशीर झाला. प्रकृती गंभीर होताच कुटुंबीयांनी पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्याला कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अहेरी येथे रेफर केले. मात्र अहेरीकडे नेत असताना रस्त्यातच त्याने अखेरचा श्वास घेतला. अहेरी येथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आयानचे वडील वन विभागात कार्यरत असून ते भामरागड डिव्हिजन कार्यालयात वनशिपाई म्हणून सेवा बजावत आहेत. आर्थिक परिस्थिती साधारण असतानाही त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी मोठे प्रयत्न केले होते.
अभ्यासासोबतच आयानला क्रिकेटची विशेष आवड होती. तो उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होता. त्याच्या खेळातील कौशल्य पाहून त्याच्या वडिलांची त्याला नागपूर येथील क्रिकेट अकॅडमीत प्रशिक्षणासाठी पाठवण्याची इच्छा होती. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे एक होतकरू क्रिकेटपटू आणि हुशार विद्यार्थी काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.