नारीशक्तीला घटनात्मक बळ देणारे ऐतिहासिक नारीशक्ती वंदन विधेयक उद्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत संसदेमध्ये मांडले जाणार असून, या विधेयकाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
नारीशक्तीला बळ देणाऱ्या दोन नेतृत्वशील स्त्रियांची भावनिक भेट
चिखली (Shweta Mahale Patil) : नारीशक्तीला घटनात्मक बळ देणारे ऐतिहासिक नारीशक्ती वंदन विधेयक उद्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत संसदेमध्ये मांडले जाणार असून, या विधेयकाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षामार्फत 966717333 हा विशेष क्रमांक जारी करण्यात आला असून, देशातील तमाम नागरिकांनी या विधेयकाच्या समर्थनार्थ मिस कॉल देऊन नारीशक्तीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या पवित्र भूमीत चिखली विधानसभा मतदारसंघात एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंग घडला. विद्यमान आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी या मतदारसंघाच्या तीन वेळा आमदार राहिलेल्या माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर यांची भेट घेतली.
ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर स्त्री नेतृत्वाच्या सातत्याची आणि सशक्त परंपरेची साक्ष देणारी ठरली. ज्या मतदारसंघात महिलांना कोणतेही आरक्षण नसताना, प्रस्थापितांना पराभूत करून या दोन्ही महिला नेत्यांनी लोकप्रतिनिधित्व केले त्याच भूमीत आज त्या पुन्हा एकत्र येऊन नारीशक्तीच्या भविष्यासाठी उभ्या ठाकल्या.योगायोग म्हणजे दोघींनीही भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे.
आमदार श्वेता महाले पाटील यांनी नारीशक्ती वंदन विधेयकाची सविस्तर माहिती देत माजी आमदार रेखाताई खेडेकर यांचे खुले समर्थन मिळवले. या विधेयकामुळे विधानसभांमध्ये आणि संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार असून, स्त्रियांची संख्या आणि प्रभाव दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.
राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील या दोन कर्तृत्ववान महिलांची भेट म्हणजे स्त्रीशक्तीच्या उभारणीचा प्रेरणादायी क्षण ठरला. स्वतः स्त्रिया असूनही कोणत्याही आरक्षणाशिवाय मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांनी आज नव्या पिढीतील महिलांसाठी मार्ग अधिक सुलभ करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी आमदार श्वेता महाले पाटील यांनी राज्यभरातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “नारीशक्ती अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने या विधेयकाला समर्थन द्यावे. हा केवळ महिलांचा नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा मार्ग आहे.”
नारीशक्तीच्या सन्मानासाठी आणि सबलीकरणासाठी उचललेले हे पाऊल देशाच्या लोकशाहीला अधिक समृद्ध करणारे ठरणार आहे आणि बुलढाण्यातील या दोन नेतृत्वशील स्त्रियांची भेट त्याचीच सशक्त सुरुवात मानली जात आहे..