प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून अनेक शेतकऱ्यांनी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
हिंगोली (Shaktipeeth Highway) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून अनेक शेतकऱ्यांनी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “शक्तीपीठ महामार्गाचा नाद कोणी करू नये. हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे,” असा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
नागपूर ते गोवा या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाडा व विदर्भातील 11 जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेती बाधित होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातूनही हा महामार्ग जाणार असून, सुपीक जमिनी, विहिरी, फळबागा संपुष्टात येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार आष्टीकर यांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली.
“विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी देणार असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आधीच हिंगोली जिल्हा अवर्षणग्रस्त आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचा डाव आम्ही हाणून पाडू,” असे आष्टीकर म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. “समृद्धी महामार्गाचे काय झाले ते जनतेने पाहिले. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तेच शक्तीपीठ महामार्गात होऊ देणार नाही. गरज भासल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा खासदारांनी दिला.
दरम्यान, महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठका जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. खासदार आष्टीकर यांनीही लवकरच शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांच्या हितापेक्षा काहीही मोठे नाही. हा महामार्ग रद्द करा किंवा पर्यायी मार्ग काढा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा,” असा थेट संदेश त्यांनी सरकारला दिला आहे. पालकमंत्री शुक्रवारी वर्धापन दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला आले असता हा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठकांसाठी आले होते त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी हा महामार्ग कदापिही होऊ दिला जाणार नाही असा इशारा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना दिला.