Shaktipeeth Anti Sangharsh Samiti: वसमत येथे शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा यलगार मोर्चा काढण्यात आला
बाधित शेतकरी व महिलांची संख्या लक्षणीय
वसमत (Shaktipeeth Anti Sangharsh Samiti) : वसमत येथे शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा यलगार मोर्चा काढण्यात आला यामध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध करण्यात आला या यलगार मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बाधित शेतकरी महिला शेतकरी व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. वसमत येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचा व शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा मंगळवारी काढण्यात आला.
उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले सभेच्यामाध्यमातून उपस्थित शेतकरी बांधवांच्या व्यथा आणि वेदना मांडताना शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी शक्तीपीठाला कडाडून विरोध दर्शवणारे भाषण केले व शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही अशी घोषणा केली हिंगोली जिल्हा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मोर्चात सहभागी विविध पक्ष व संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनोगते व्यक्त करून (Shaktipeeth Anti Sangharsh Samiti) शक्तीपीठ महामार्गाचे संभाव्य तोटे आधोरेखित केले. यावेळी हिंगोली जिल्हा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे तानाजी भोसले, नवनाथ पाटील, नामदेव दळवी, शिवाजी भालेराव, सीताराम जाधव, दिनेश हनुमंते, गोरख चव्हाण, हनुमंत राजेगोरे, आलोक इंगोले यांच्यासह शिवसेना, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी, प्रहार, मराठसेवा संघासह जिल्हाभरातील शेतकरी पुरूष, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सत्यपीठ महामार्ग म्हणजे शेतकरी बांधवांना विस्थापित करणारा कागदी ड्रीम प्रोजेक्ट आहे. नागपूर ते गोवा असा तब्बल ८०० किलोमीटर लांबीचा आणि हा सहापदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे आहे. राज्यातील ३ शक्तीपीठे अर्थात तुळजापूर, माहूर, कोल्हापूरची अंबाबाई जोडणे, हा उद्देश सांगितला जातो आहे. त्यासाठी १२ जिल्हे, २९ तालुके आणि ३७० गावे या महामार्गाखाली येणार आहेत.शक्तीपीठ महामार्गामुळे ८०० किमी हे अंतर केवळ ८ तासात कापणार, असंही सांगितलं जाते मात्र, शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना प्रचंड तोटा होणार असल्याने व अनेक शेतकरी भूमिहीन होणार असल्याने शक्ती पिठाला कडाडून विरोध होत असल्याचे शेतकरी नेते संदीप माटेगावकर यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.