जवळपास सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईसाठी रेल्वे मिळाली असली तरी या रेल्वेचे वेळापत्रक गैरसोयीचे असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
हिंगोली (Railway Schedule) : जवळपास सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईसाठी रेल्वे मिळाली असली तरी या रेल्वेचे वेळापत्रक गैरसोयीचे असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वे रुळावर असूनही राज्याच्या राजधानी मुंबईशी थेट जोडलेले नसलेले हिंगोली व वाशिम हे राज्यातील दोनच जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांना मुंबईशी जोडण्यासाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील रेल्वे संघर्ष समित्यांनी सातत्याने लावून धरली होती. हिंगोलीत झालेल्या आंदोलनादरम्यान मुंबई व छपरा रेल्वेची मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती. विशेष म्हणजे या आंदोलनात सहभागी झालेल्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तो खटला आजही सुरू आहे.
इतक्या प्रयत्नांनंतर सुरू होणारी ही रेल्वे चुकीच्या वेळापत्रकामुळे पुन्हा गैरसोयीची ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. आठवड्यातून सोमवार व बुधवार असे दोन दिवस या रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे. नियमित वेळापत्रकानुसार ही रेल्वे नांदेडहून रात्री ९.१५ वाजता सुटणार आहे. ती हिंगोली येथे रात्री साडेबारा, वाशिम येथे सव्वाएक, अकोला येथे पावणेचार आणि मलकापूर येथे पावणेपाच वाजता पोहोचणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ही रेल्वे दुपारी १.४० वाजता पोहोचणार आहे.
या वेळापत्रकामुळे एका दिवसात शासकीय कामे किंवा खरेदी करून परत येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ही रेल्वे अत्यंत गैरसोयीची ठरणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास कुर्ला येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी आणखी वेळ लागत असल्याने संपूर्ण दिवस वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचा कल पुन्हा खाजगी प्रवासाकडे वळण्याची भीती व्यक्त होत आहे. हिंगोली, वाशिम व अकोला येथील प्रवाशांना मध्यरात्री ही रेल्वे पकडावी लागणार असल्याने वेळापत्रकाबाबत नाराजी वाढत आहे.
परतीच्या प्रवासासाठी ही रेल्वे दर मंगळवार व गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटणार असल्याने या वेळेबाबत फारशा तक्रारी नाहीत.
सध्या हिंगोलीहून धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस केवळ छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या प्रवाशांसाठीच सोयीची ठरत असून मुंबईसाठी ती उपयुक्त नसल्याची चर्चा आहे. रेल्वे संघर्ष समितीने वेळापत्रक बदलण्याची व ‘लूज टाइम’ कमी करण्याची मागणी वारंवार केली आहे. तरीही नव्या रेल्वेचे वेळापत्रकही गैरसोयीचे ठरल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
उद्घाटनाच्या दिवशीचे वेळापत्रकच कायम करण्याची मागणी
१९ मे रोजी उद्घाटनाच्या दिवशी ही रेल्वे नांदेड येथून दुपारी ४ वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध होत असेल, तर नियमित वेळापत्रकातही हीच वेळ का ठेवली जात नाही, असा सवाल रेल्वे संघर्ष समितीने उपस्थित केला आहे.
उद्घाटनाच्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे वसमत येथे सायं. ५.३०, हिंगोली येथे ६.४०, वाशिम येथे ७.२८, अकोला येथे ९.०० आणि मलकापूर येथे १०.०८ वाजता पोहोचणार आहे. हे वेळापत्रक प्रवाशांसाठी अधिक सोयीचे असल्याने तेच कायम ठेवण्याची मागणी होत आहे.