Dr. Venkatesh Kabde: नांदेडमध्ये व्यंकटेश काब्दे यांच्या राजीनाम्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आज सत्याग्रह आंदोलन सुरू केले, राजीनामा मंजूर करू नये असे आवाहन.
Dr. Venkatesh Kabde |
महाविद्यालयाबाहेर आज विद्यार्थी संघटनांचे 'सत्याग्रह आंदोलन'
नांदेड (Dr. Venkatesh Kabde) : नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे (Dr. Venkatesh Kabde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, संस्था तो स्वीकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. हा निर्णय विद्यार्थी आणि संस्थेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत क्लेशदायक असल्याचे सांगत, या राजीनाम्याविरोधात विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा राजीनामा मंजूर करू नये, या मागणीसाठी आज शुक्रवार २७ मार्च महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एसएफआय,डिवायएफआय,एएसएफआय,विद्यार्थी युवक कृती समितीच्यावतीने 'सत्याग्रह आंदोलन' करण्यात येणार असल्याचे निवेदन भाग्यनगर पोलिसांना देण्यात आले आहे.
नांदेड एज्युकेशन सोसायटी ही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली संस्था आहे. गोविंदभाई श्रॉफ, नरहर कुरुंदकर, भाई सदाशिवराव पाटील, डॉ. सुरेंद्र बारलिंगे आणि दत्ता भगत यांसारख्या महान व्यक्तींचा वारसा या संस्थेला लाभलेला आहे. डॉ. व्यंकटेश काब्दे (Dr. Venkatesh Kabde) यांनी या परंपरेचा सन्मान राखत संस्थेच्या सामाजिक बांधिलकीला अधिक दृढ केले आहे. सध्याच्या काळात संस्थेला त्यांच्यासारख्या अनुभवी आणि विचारशील नेतृत्वाची नितांत गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विद्यार्थी संघटनांच्या मते, संस्थेतील काही चुकीच्या घडामोडींमुळे व्यथित होऊन डॉ. काब्दे यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. ते केवळ संस्थेचे अध्यक्ष नसून नांदेड जिल्ह्यातील सामान्य आणि गोरगरीब जनतेचे खंबीर नेतृत्व आहेत.
त्यांच्या राजीनाम्यामुळे संस्थेची शैक्षणिक शिस्त आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २७ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सायन्स कॉलेज व पीपल्स कॉलेजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एसएफआय,डिवायएफआय,एएसएफआय,विद्यार्थी युवक कृती समितीच्यावतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी डॉ. काब्दे यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाऊ नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.