विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
मुंबई (Political Conflict) : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही चर्चा न करता घेतलेला हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. माणिकराव ठाकरे यांनीही याच भूमिकेला दुजोरा दिला आहे. परिणामी, काँग्रेसने स्वतःचा उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
विधान परिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत उद्याची आहे. शिवसेना (उबाठा)ने अंबादास दानवे यांचे नाव जाहीर केले आहे. दानवे हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार त्यांना केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. अशातच काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील मतभेद उफाळून आल्याने ही एकमेव जागाही धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत सांगितले की, “जर विधान परिषदेसाठी शिवसेना (उबाठा) निवडणूक लढवत असेल, तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा देण्यास तयार होतो. मात्र आमच्याशी कोणतीही चर्चा न करता उमेदवार जाहीर करण्यात आला, हे योग्य नाही. आघाडीतील पक्षांशी किमान संवाद साधणे अपेक्षित होते.” विशेष म्हणजे, वडेट्टीवार पूर्वी शिवसेनेत होते आणि २००४ मध्ये त्यांनी चिमूर मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता.
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधला. शिवसेनेने या संदर्भात काही चर्चा केली होती का, असे विचारले असता त्यांनी नकार दिला. आता आम्ही अंतर्गत चर्चा करून उमेदवारीबाबत निर्णय घेऊ.” त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसही विधान परिषदेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
यावेळी त्यांनी आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांचाही उल्लेख केला. “अलीकडेच राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या नावावर एकमत झाले होते. आता विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्याची आमची भूमिका होती; मात्र चर्चा न करता घेतलेल्या निर्णयामुळे दोन वर्षांनी होणारी राज्यसभेची जागा काँग्रेसलाच मिळायला हवी,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, २०२८ मध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसने आतापासूनच दावा ठोकला आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपत असून, त्यानंतर पुन्हा निवडून येण्यासाठी आघाडीतील इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. सध्याच्या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला स्वतंत्रपणे त्यांना राज्यसभेत पाठवणे कठीण ठरू शकते. परिणामी, भविष्यात राऊत यांच्या राजकीय वाटचालीबाबतही अनिश्चितता निर्माण झाल्याचे चित्र आहे.