Rojgar Hami Yojana: पातूर तालुक्यातील पेव्हर ब्लॉक कामांच्या बिलांना प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे. विविध महत्वाच्या प्रकल्पांची बिले प्रलंबित असताना ही घाई निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
पातूर (Rojgar Hami Yojana) : तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक कामांच्या बिलांना प्राधान्य दिले जात असल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणामुळे विविध स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी पंचायत समितीमध्ये याच कामांवरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रोजगार हमी योजनेतील (Rojgar Hami Yojana) 85-15 या तरतुदीनुसार 15 टक्के निधी मजुरीसाठी तर 85 टक्के निधी इतर कामांसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेव्हर ब्लॉकची कामे राबवून त्यांच्या बिलांना प्राधान्याने मंजुरी दिली जात असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे, विहीर खोदकाम, घरकुल योजना यांसारखी महत्त्वाची कामे प्रलंबित ठेवून पेव्हर ब्लॉकच्या बिलांची तत्काळ पूर्तता केली जात असल्याचा आरोपही होत आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने सांगितले की, या कामांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा (मलिदा) मिळत असल्यानेच ही घाई केली जात आहे. यासंदर्भात पंचायत समितीपासून जिल्हा परिषद आणि मंत्रालयापर्यंत काही ठेकेदारांनी ‘सेटिंग’ लावल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे पेव्हर ब्लॉकच्या कामांची बिले वेगाने मंजूर होत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या (Rojgar Hami Yojana) संपूर्ण प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि काही शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा तालुक्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.