Patur Municipal Council: मान्सूनपूर्व नाले व गटारांची साफसफाई करण्यास नगरपरिषद प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने शहरात नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमेश देशमुख
पातूर (Patur Municipal Council) : मान्सूनपूर्व नाले व गटारांची साफसफाई करण्यास नगरपरिषद प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने शहरात नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी नाले व मोठ्या गटारांची साफसफाई करून पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावणे ही नगरपरिषद प्रशासनाची जबाबदारी असते. मात्र, यावर्षी अद्यापही कोणतीही ठोस साफसफाई किंवा दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत.
शहरातील लहान-मोठे नाले, पावसाचे पाणी गावाबाहेर नेणारे मार्ग आणि गटारे साफ न झाल्यास पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होतो. परिणामी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी या कामांसाठी निविदा काढून साफसफाई केली जाते. मात्र, यंदा नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहितेमुळे निविदा काढता येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तरीही, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचा प्रश्न लक्षात घेता पर्यायी उपाययोजना करणे आवश्यक होते, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासन (Patur Municipal Council) निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने शहरातील मूलभूत सेवांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. साफसफाईच्या निविदा निधीअभावी आधीच रखडल्या असून परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. याबाबत मुख्याधिकारी अक्षय गडलिंगे यांनी सांगितले की, आचारसंहितेमुळे नवीन निविदा काढता येत नसल्या तरी उपलब्ध साफसफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नालेसफाईची कामे करण्यात येतील. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्यक्षात ही कामे वेळेत पूर्ण होणार का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता कायम आहे.