Parbhani District Bank: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ५३५ संस्थांचे ठराव प्राप्त झाले आहेत, ज्यामुळे निवडणुकीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
लोकशाही प्रक्रियेला वेग
जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी पिडीसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पाठविली माहिती
हिंगोली (Parbhani District Bank) : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी संचालक मंडळ निवडणुकीसाठी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी होणार्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सदस्य संस्थांचे प्रतिनिधी ठरविण्याची प्रक्रिया पूर्णत्वाकडे जात आहे. हिंगोली जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने परभणी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना याबतचे अधिकृत पत्र पाठवले आहे.
२७ एप्रिल रोजी निर्गमित झालेल्या या पत्रानुसार, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा, वसमत, कळमनुरी आणि सेनगाव या पाच तालुक्यांमधून एकूण ५३५ सदस्य संस्थांचे ठराव प्राप्त झाले आहेत. या ठरावांसोबत सभासद संस्थांची नमुना ई-३(१) यादी देखील जोडण्यात आली आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी सुरेखा फुपाटे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र पाठवण्यात आले आहे.प्राप्त आकडेवारीनुसार, हिंगोली तालुक्यातून सर्वाधिक १२७, वसमत तालुक्यातून १२७, सेनगावमधून १०८, कळमनुरीतून ९४ तर औंढा तालुक्यातून ७९ अशा एकूण ५३५ संस्थांनी आपल्या प्रतिनिधींचे ठराव वेळेत सादर केले आहेत. यामध्ये ४०४ विकास संस्था, ७ प्रक्रिया संस्था आणि १२४ इतर संस्थांचा समावेश आहे.
या (Parbhani District Bank) उत्स्फूर्त प्रतिसादामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणात ठराव वेळेत प्राप्त होणे ही बँकेच्या मजबूत लोकशाही व्यवस्थेची पावती आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. त्यामुळे नवीन संचालक मंडळाकडून शेतकर्यांना अधिक सक्षम सेवा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.हे सर्व ठराव व यादी आता परभणी बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या २० मार्च २०२५ च्या पत्रानुसार ही कार्यवाही करण्यात आली. यामुळे लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.हजारो शेतकरी सभासदांचे आर्थिक व्यवहार या बँकेमार्फत होत असल्याने नवीन संचालक मंडळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणूक पार पडून बँकेच्या कारभाराला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.