Maharajswa Samadhan Camp: नांदेड येथे आयोजित केलेल्या शिबिरात 702 डिजिटल सातबारा व 669 आठ-अ उताऱ्यांचे वितरण करण्यात आले आणि 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळाला.
702 डिजिटल सातबारा व 669 आठ-अ उताऱ्यांचे वाटप; 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ
नांदेड (Maharajswa Samadhan Camp) : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी नांदेड व संजय वारकड तहसीलदार नांदेड यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील तिसरे शिबिर विष्णुपुरी येथे उत्साहात पार पडले. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या (Maharajswa Samadhan Camp) शिबिरामध्ये ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमिअभिलेख (मोजणी) तसेच दुय्यम निबंधक , महावितरण विभागासह विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले. तहसील कार्यालय, नांदेड यांच्या वतीने शिबिरात महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये 702 ऑनलाईन सातबारा उतारे व 669 आठ-अ उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच 10 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय फेरफार संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले.
शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या. या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार आनंदरावजी बोंढारकर यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागांच्या स्टॉल्सला भेटी देऊन नागरिकांचे विविध प्रश्न ऐकून संबंधित विभागाला तात्काळ सदर प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात सूचना केल्या. यावेळी आमदार महोदयांनी तहसील कार्यालया मार्फत देण्यात येणारे विविध प्रमाणपत्रे विहित मुदतीत देत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला नांदेड दक्षिणचे आमदार मोंढारकर साहेब यांनी मार्गदर्शन केले.
नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. नायब तहसीलदार माचेवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर मंडळ अधिकारी श्रीकृष्ण एलमटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. पुरवठा विभागातील मारतळेकर मॅडम पवार मॅडम यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले.
तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी श्रीकृष्ण एलमटे तलाठी रमेश गिरी, मनोज जाधव ,मनोज सरपे, माधव भिसे , महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी विशेष योगदान दिले. शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.