शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून अकोलेकरांमध्ये नाराजी वाढत असून, स्थानिक प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
अकोला : शहरातील वाढत्या मूलभूत समस्यांमुळे अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “नेते झाले झकास, अकोला करुराहले भकास” अशा शब्दांत नागरिकांनी शहरातील दयनीय परिस्थितीवर रोष व्यक्त करत विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महापालिकेच्या आवारात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून सत्ताधारी आणि प्रशासनाचे लक्ष शहरातील मूलभूत समस्यांकडे वेधण्यात आले. नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांचा वाढता त्रास गंभीर समस्या बनला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच अनेक भागांत स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असून, अनियमित व दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, नाले आणि गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने आगामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील कचरा व्यवस्थापनावरही नाराजी व्यक्त करण्यात आली असून, “घंटागाडी” सेवा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून मोफत कचरा संकलन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फॉगिंग मशीनचा प्रभावी वापर का केला जात नाही, असा सवालही प्रशासनाला करण्यात आला. त्याचबरोबर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक १४ मधील शिवणी मलकापूर परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाले आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावाकडे विशेष लक्ष वेधले. ज्या भागात अद्याप पाणी वाहिनी पोहोचलेली नाही, त्या ठिकाणी तातडीने पाणी वाहिनी टाकण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
अकोला शहरासह हद्दवाढ भागातील अनेक प्रभागांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आरोग्य सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित करत भारतीय व कस्तुरबा गांधी रुग्णालयांमध्ये कर्करोग, मूत्रपिंडासारख्या गंभीर आजारांवरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
याशिवाय वृक्षारोपणाचे नियोजन, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन तसेच महापालिका शाळांचे डिजिटलायझेशन करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली.
“जनता कर भरते, मात्र त्याबदल्यात पाणी, रस्ते, स्वच्छता आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. नागरिक त्रस्त आहेत आणि सत्ताधारी मात्र वातानुकूलित दालनांमध्ये सुखात आहेत,” अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
शेवटी, “हुकूमशाही चालणार नाही, अकोलेकरांच्या प्रश्नांसाठी आम्ही आवाज उठवत राहू,” असा इशारा देत प्रशासनाने तातडीने समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. “भारतीय संविधानाचा विजय असो” अशा घोषणांनी आंदोलनाचा सूर अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले.