Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

उदगीरमध्ये अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात उदगीर जिल्हा मागणीचा जोर; पालकमंत्र्यांचे सकारात्मक संकेत

उदगीर जिल्हा व्हावा ही उदगीरकरांची तसेच आमदार संजय बनसोडे यांची मागणी असून, त्या दृष्टीने सरकार सकारात्मक असल्याचे संकेत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दि


उदगीरमध्ये अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात उदगीर जिल्हा मागणीचा जोर पालकमंत्र्यांचे सकारात्मक संकेत

Marathi Journalism |

उदगीरमध्ये अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात उदगीर जिल्हा मागणीचा जोर; पालकमंत्र्यांचे सकारात्मक संकेत

उदगीर (Marathi Journalism) : उदगीर जिल्हा व्हावा ही उदगीरकरांची तसेच आमदार संजय बनसोडे यांची मागणी असून, त्या दृष्टीने सरकार सकारात्मक असल्याचे संकेत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले. उदगीर येथे आयोजित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले की, “उदगीर जिल्हा व्हावा यासाठीची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. मात्र आमदार संजय बनसोडे हे थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यांनी पुढाकार घेतल्यास आम्हीही त्यांच्यासोबत जाण्यास तयार आहोत. त्यांच्या ताकदीमुळे उदगीरकरांची जिल्हा निर्मितीची अपेक्षा निश्चित पूर्ण होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे उदगीर जिल्हा निर्मितीबाबत सकारात्मक आहेत. आवश्यक सर्व मूलभूत सुविधा तयार करण्यात आल्या असून, सरकार या विषयावर गंभीरपणे पाठपुरावा करत आहे.

​​​​​​​

उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख होते, तर उद्घाटक म्हणून राजेंद्र दर्डा उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी भारत बाष्टेवाड, पोलिस अधीक्षक अमोल तांबे, नगराध्यक्षा स्वाती हुडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, तहसीलदार राम बोरगावकर, विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य सुधीर जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन राजेंद्र दर्डा, शिवेंद्रसिंह राजे भोसले, बाबासाहेब पाटील आणि एस. एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री भोसले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर भाष्य करताना सांगितले की, “सरकार पत्रकारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून तपश्चर्या आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची पायाभरणी केली, तर लोकमान्य टिळकांनी तिला बळ दिले. पत्रकारांचे लेखन सत्ताधाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडते.” त्यांनी लातूर सिव्हिल हॉस्पिटलच्या कामातही पत्रकारांच्या आंदोलनाचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि एस. एम. देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अधिवेशनाच्या निमित्ताने सकाळी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेसह प्रभात फेरी काढून सर्वांचे लक्ष वेधले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन शिवशेट्टे, युवराज धोतरे, बिभीषण मद्देवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, अर्जुन जाधव यांच्यासह स्थानिक पत्रकारांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता यलमटे, श्रीपाद सिमंतकर व रसूल पठाण यांनी केले, तर प्रस्ताविक सचिन शिवशेट्टे यांनी मांडले आणि आभार बिभीषण मद्देवाड यांनी मानले.

अधिवेशनात उदगीर जिल्हा मागणीचा जोर

या अधिवेशनात उदगीर जिल्हा कृती समितीने पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह उपस्थित मान्यवरांना निवेदन देत उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने उदगीरकर उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनीही या मुद्द्यावर जोर देत पालकमंत्र्यांनी जिल्हा निर्मितीसाठी सक्रिय प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. यावर प्रतिसाद देताना पालकमंत्री भोसले म्हणाले, “सरकार सकारात्मक आहे. जिल्हा झाला तरी मी मंत्री असताना मीच पालकमंत्री असेन. तेव्हा मला विसरू नका, मी दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्री असेन.” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

एकूणच, या पत्रकार अधिवेशनात उदगीर जिल्हा निर्मितीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला असून, सरकार सकारात्मक असल्याचे संकेत मिळाल्याने उदगीरकरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

“अनेकांनी शब्द दिला पण पाळला नाही” – एस. एम. देशमुख

कार्यक्रमात बोलताना एस. एम. देशमुख यांनी अनुपस्थित राहिलेल्या निमंत्रितांवर नाराजी व्यक्त केली. “अनेकांनी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले, मात्र ते पाळले नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी अनेकांना निमंत्रण देण्यात आले होते, मात्र काही मान्यवर अनुपस्थित राहिल्याने त्यांनी खंत व्यक्त केली.

Related to this topic: