ShivSena Amol Khillari: महावितरण अंतर्गत आरडीएसएस योजनेच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत शिवसेनेचे अमोल खिल्लारी यांनी १६ एप्रिलपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिवसेना तालुका प्रमुख अमोल पाटील खिल्लारी यांचा इशारा
सेनगाव (ShivSena Amol Khillari) : हिंगोली जिल्ह्यात महावितरण अंतर्गत सुरू असलेल्या आर.डी.एस.एस. (RDSS) योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे सेनगाव तालुका प्रमुख अमोल सीताराम खिल्लारी (ShivSena Amol Khillari) यांनी केला आहे. या प्रकरणाची १५ एप्रिलपर्यंत चौकशी करून कारवाई न झाल्यास, १६ एप्रिलपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. या संदर्भात अधीक्षक अभियंता, महावितरण हिंगोली यांना दिलेल्या निवेदनात खिल्लारी यांनी कामातील त्रुटींवर बोट ठेवले आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी: ए.बी. केबल आणि गावठाण फीडर (सप्रेशन) च्या कामांची चौकशी करण्यासाठी तातडीने उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. तक्रारदार आणि पत्रकारांच्या उपस्थितीत कामाची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करण्यात यावी. साहित्याची गुणवत्ता कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता आणि ठरवून दिलेल्या मापदंडांची काटेकोर तपासणी करावी. सन २०२० ते २०२६ या कालावधीत एच.व्ही.डी.एस. (HVDS) व एन.ए.सी. (NAC) अंतर्गत झालेल्या सर्व कामांची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अपुरा कर्मचारी वर्ग आणि रखडलेली कामे अनेक आहेत. ज्यामध्ये मे. पॉलीकॅब आणि अशोक बिल्डकॉन यांसारख्या एजन्सीमार्फत सुरू असलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून ती अर्धवट स्थितीत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. अनेक ठिकाणी केबलचे तार जमिनीवर पडलेले असून त्यामुळे अपघाताची टांगती तलवार आहे. वारंवार कागदपत्रांची मागणी करूनही महावितरणकडून टाळाटाळ केली जात असल्याचेही खिल्लारी यांनी म्हटले आहे. प्रशासनाने १५ एप्रिल २०२६ पर्यंत या प्रकरणाची चौकशी करून ठोस कारवाई न केल्यास, १६ एप्रिलपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारले जाईल, असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे सेनगाव तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी (ShivSena Amol Khillari) यांनी दिला आहे.