महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तब्बल चार वर्षांपासून रिक्त असलेल्या 16 जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
16 मतदारसंघात आदर्श आचार संहिता लागू
नवी दिल्ली (Maharashtra Politics) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील तब्बल चार वर्षांपासून रिक्त असलेल्या 16 जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार या 16 जागांसाठी येत्या 18 जून 2026 रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल.
निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे ही निवडणूक गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडली होती. आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी त्या मतदारसंघातील किमान 75 टक्के स्थानिक संस्था कार्यरत असणे आणि किमान 75 टक्के मतदार पदावर असणे बंधनकारक आहे. कोरोना काळानंतर अनेक महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका न झाल्याने ही 75 टक्क्यांची अट पूर्ण होत नव्हती. त्यामुळे जानेवारी 2022 पासून या 16 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुका घेता आल्या नव्हत्या. मात्र आता मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी सर्व 16 मतदारसंघात या अटी पूर्ण झाल्याचे आयोगाला कळवले आहे. त्यामुळे आयोगाने या रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
या 16 जागांवरील सदस्यांचा कार्यकाळ वेगवेगळ्या तारखांना संपला होता. सोलापूर मतदारसंघाचे सदस्य प्रशांत प्रभाकर परिचारक आणि अहमदनगरचे अरुणकाका बाळभीमराव जगताप यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपला होता. ठाण्याचे फाटक रवींद्र सदानंद यांचा कार्यकाळ 8 जून 2022 रोजी संपुष्टात आला. त्यानंतर जळगावचे चंदूभाई व्ही. पटेल, सांगली-सातारा मतदारसंघाचे कदम मोहनराव श्रीपती, नांदेडचे अमरनाथ अनंतराव राजूरकर, यवतमाळचे दुष्यंत सतीश चतुर्वेदी, पुण्याचे अनिल शिवाजीराव भोसले आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे डॉ. परिणय रमेश फुके या सहा सदस्यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर 2022 रोजी संपला.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या संयुक्त मतदारसंघाचे सदस्य अनिकेत सुनील तटकरे यांचा कार्यकाळ 31 मे 2024 रोजी संपला, तर नाशिकचे नरेंद्र भिकाजी दराडे, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोलीचे रामदास भगवानजी आंबटकर, अमरावतीचे प्रवीण रामचंद्र पोटे, उस्मानाबाद- लातूर-बीड मतदारसंघाचे धस सुरेश रामचंद्र आणि परभणी-हिंगोलीचे विप्लव गोपिकिशन बाजोरिया या पाच जणांचा कार्यकाळ 21 जून 2024 रोजी संपला होता. सर्वात शेवटी औरंगाबाद-जालना मतदारसंघाचे सदस्य अंबादास एकनाथराव दानवे यांचा कार्यकाळ 29 ऑगस्ट 2025 रोजी संपुष्टात आला.
जाहीर कार्यक्रमानुसार, 25 मे 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना निघेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून असून 2 जूनला अर्जांची छाननी होईल. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि 22 जून रोजी मतमोजणी होऊन 25 जूनपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
या निवडणुकीसाठी संबंधित 16 मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यमान संख्याबळावरच या निवडणुकीचा निकाल अवलंबून असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. चार वर्षे प्रलंबित राहिल्याने विधान परिषदेतील राजकीय समीकरणे या निवडणुकीमुळे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.