Census boycott: जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे तिरखेडी, गांधीटोला, भजेपार व बोदलबोडी या चार ग्राम पंचायतींनी बहिष्कार टाकला आहे.
तिरखेडी, गांधीटोला, भजेपार व बोदलबोडीचा समावेश
चौकाचौकात लावले बहिष्काराचे बॅनर
सालेकसा/गोंदिया (Census boycott) : जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे चांगलेच वातावरण तापले आहे. ओबीसी संघटनांकडून केंद्र सरकारचा निषेध नोंदवून जनगणनेवर बहिष्कार टाकला आहे. या पावलावर पाऊल ठेवत सालेकसा तालुक्यातील तिरखेडी, गांधीटोला, भजेपार, बोदलबोडी या चार ग्राम पंचायतीने सामुहिकरित्या जनगणनेवर बहिष्कार टाकला असून गावशिवारातील चौकाचौकात बहिष्काराने बॅनर लावून केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शविला आहे. यामुळे ओबीसींचा जनगणनेला घेवून सुरू असलेला लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारकडून जनगणनेला सुरूवात करण्यात आली आहे. यानुरूप १ मे पासून जनगणेच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना देण्यात आला नाही. यामुळे जनगणना कोणत्या आधारे सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित करून ओबीसी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. या संदर्भात जोपर्यत स्वतंत्र रकाना नाही, तोपर्यत जनगणनेला सहकार्य करणार, असा इशारा देत सकल ओबीसी समाजाच्या वतीने जनगणनेवर बहिष्कार घालण्यात आला आहे. यानुरूप सालेकसा तालुक्यातील जिल्हा व राज्यस्तरावरील स्मार्ट व आदर्श ग्राम पंचायत म्हणून नावारूपास आलेल्या तिरखेडी, गांधीटोला, भजेपार, बोदलबोडी या चार ग्राम पंचायतीनी एक पाऊल पुढे टाकून जनगणनेवर सामुहिकरित्या बहिष्कार टाकला आहे.
चारही ग्राम पंचायतीचे सरपंच प्रिया शरणागत, दिपिका मेंढे, चंद्रकुमार बहेकार, देवेंद्र पटले यांनी नागरिकांच्या सहकार्याने स्वतंत्र रकाना नसल्याने चौकाचौकात बहिष्काराचे फलक लावून विरोध व निषेध केला आहे. या निर्णयाचे ओबीसी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकार्यांनी गावकरी व सरपंचाचे स्वागत करून अभिनंदन केले आहे. तसेच ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी अंतिम घटकापर्यत लढण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बबलु कटरे, अमर वर्हाडे, वैâलाश भेलावे, विजय फुंडे, बंटी कटरे, हिरालाल ऊईके, योगेश फुंडे, रेखा फुंडे, टी.जी.फुंडे यांच्यासह चारही ग्राम पंचायत क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. या आक्रोश प्रदर्शनामुळे जनगणनेला घेवून ओबीसींचा सुरू असलेला लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विविध स्तरावरून बहिष्काराचा सुर
इतर प्रवर्गाप्रमाणे ओबीसींचीही स्वतंत्र जनगणना व्हावी, यासाठी संघर्ष कृती समितीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. परंतु, केंद्र शासनाकडून जनगणनेच्या नावावर पुन्हा ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. असेच दिसून येत आहे. जनगणनेच्या तक्तयात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना देण्यात आलेला नाही. यावर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत विविधस्तरावर जनगणनेवर बहिष्कार टाकले जात आहे. १ मे महाराष्ट्र दिनी सालेकसा नगराध्यक्ष व सभापतींनी स्वगणनेला विरोध दर्शविला. तर गोंदिया नगराध्यक्षानेही मुलाखतीस विरोध केला. शिवाय सालेकसा तालुक्यातील चार ग्राम पंचायतींनी सामुहिक बहिष्कार टाकून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांना निषेध केला आहे.