आलापल्ली वनपरिक्षेत्रात सामूहिक जंगल गस्ती दरम्यान वनविभागाने मोठी कारवाई करत दुर्मिळ वन्य जिवांची शिकार करणार्या १२ शिकार्यांना वनाधिकार्यांनी अटक केली आहे.
अटकेतील सर्व आरोपी एटापल्ली तालुक्यातील उडेरा गावातील रहिवासी
अहेरी (Illegal Hunting Case) : आलापल्ली वनपरिक्षेत्रात सामूहिक जंगल गस्ती दरम्यान वनविभागाने मोठी कारवाई करत दुर्मिळ वन्य जिवांची शिकार करणार्या १२ शिकार्यांना वनाधिकार्यांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांमध्ये पारध केलेले चार शेकरू, एक उडनारी खार, एक हरीनाल पक्षी तसेच घुबड प्रजातीतील पक्षी व इतर अवयवांचा समावेश आहे. आरोपींना आज २० एप्रिल रोजी चामोर्शी येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सुनील किशन नरोटी (२४), रामा घिसो धुर्वा (४६), बबलु दानु आतलामी (२२), नागेश टोकरा हिचामी (२७), देसु मुनशी गावडे (५३), सैनु गंगलु नरोटी (५०), बालाजी तोंदे पदा (२३), चंदु घिसा धुर्वा (५३), रमेश चैता आतलामी (३६), विलास दानु आतलामी (२६), बंडु फकरी तलांडी (३८) व एका अल्पवयीन आरोपीचा समावेश असून सर्वजण एटापल्ली तालुक्यातील उडेरा येथील रहिवासी आहेत.
काल दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात काही जण शिकारीसाठी लपून बसल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली. त्यानंतर गस्ती पथकाने तात्काळ परिसरात सापळा रचून पाठलाग केला असता १२ जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत शिकार्यांकडून विविध वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले.
वन्यप्राणी शेकरु, हरीयाल पक्षी व दयाळ पक्षी यांची अवैध्यरित्या शिकार केल्याबाबत या १२ जणांवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) डी. आय, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५०,५१ व महाराष्ट्र वन नियमावली नियम नुसार सदर त्यांचेवर वनगुन्हा क्रमांक ०५/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींची अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी चामोर्शी येथील न्यायालयात हजर करण्यासाठी सायंकाळच्या सुमारास अहेरी येथून चामोर्शी येथे रवाना करण्यात आले होते.
रात्री उशीरा चामोर्शी येथील न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी ठोठावली आहे. सदर कारवाई ही आलापल्लीच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले व उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक पुन्नमचंद बुधवार, वनरक्षक दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम, वाहन चालक सुरेश मडावी, चौकीदार श्याम जंगमवार, नामाजी मडावी व देवाजी सलामे आदी उपस्थित होते.