हिंगोली शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हिंगोली नगर परिषदेने मोठी कारवाई केली आहे.
हिंगोली (Illegal Hoardings) : हिंगोली शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हिंगोली नगर परिषदेने मोठी कारवाई केली आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये लाकडी बांबू आणि बल्लीच्या सहाय्याने उभारलेले अनधिकृत होर्डिंग व टॉवर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याची बाब नगरपालिकेच्या निदर्शनास आली होती. यावर तातडीने पाऊल उचलत नगरपालिकेने संबंधितांना 14 मे रोजी नोटीस बजावली. त्यानुसार होल्डिंग व बॅनर तात्काळ हटविण्यात आले.
हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, म. गांधी चौक, अग्रसेन महाराज चौक, इंदिरा गांधी चौक तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यालगत मोठमोठे टॉवर उभारून त्यावर बॅनर लावण्यात आले आहेत. अवकाळी पाऊस व सोसाट्याचा वारा आल्यास हे टॉवर व बॅनर रस्त्यावर कोसळून नागरिकांच्या जीविताला व मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे
हिंगोली शहरातील सात जणांना पोलिसांनी नोटीसद्वारे सक्त ताकीद देण्यात आली. महाराष्ट्र विरूपण अधिनियम 1965 चे कलम 2 क नुसार, नोटीस मिळाल्यानंतरही टॉवर न काढल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता थेट शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला होता.
नगरपालिकेच्या या कडक भूमिकेचा तात्काळ परिणाम दिसून आला. नोटीस मिळताच संबंधितांनी शहरातील सर्व धोकादायक लाकडी टॉवर व त्यावरील होर्डिंग तातडीने हटवले. नगरपालिकेच्या या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितले की, शहराचे सौंदर्य व नागरिकांची सुरक्षा ही नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. यापुढेही अनधिकृत होर्डिंग व बांधकामांवर कठोर कारवाई सुरू राहील. शहरात परवानगीशिवाय कोणतेही टॉवर किंवा बॅनर उभारल्यास थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.