बीड शहरात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे.
नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या कारवाईवर नागरिकांचा संताप; प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह
बीड (Humanity First) : बीड शहरात मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विक्रीसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेचा भाजीपाला, डबा आणि इतर साहित्य थेट कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला उदरनिर्वाहासाठी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करत होती. मात्र अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान नगर परिषद कर्मचाऱ्यांनी तिच्याकडील भाजीपाला, टोपली आणि इतर साहित्य जबरदस्तीने उचलून कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेदरम्यान वृद्ध महिला रडत विनवण्या करत असल्याचे सांगितले जात आहे. “गरिबीमुळे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी या वयात भाजी विक्री करत होते, तेही हिरावून घेतले,” अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा अमानुष वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अतिक्रमण हटाव मोहिम राबविताना गरिब आणि वृद्ध व्यक्तींशी मानवीय दृष्टिकोनातून वागणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर नगर परिषद प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या घटनेमुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.