हिंगोली शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर आज नागरिकांचा संताप उफाळून आला.
हिंगोली (Hingoli Water Crisis) : हिंगोली शहरातील तीव्र पाणी टंचाईच्या प्रश्नावर आज नागरिकांचा संताप उफाळून आला. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा सुरू असताना शिवसेना उबाठा शेतकरी सेना प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम अहमद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला-पुरुषांनी त्यांचा वाहन ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र ताफा न थांबल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच हातातील मडकी फोडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. आठ-आठ दिवसांनी केवळ एकदाच आणि तेही अपुरे पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. या पार्श्वभूमीवर एक मे रोजी पालकमंत्री झिरवाळ हिंगोली दौऱ्यावर असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना निवेदन देण्यासाठी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना उबाठा शेतकरी सेना प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम अहमद देशमुख म्हणाले, "वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला जाग येत नाही. पाण्यासाठी आया-बहिणींना वणवण करावी लागत आहे. पालकमंत्र्यांनी किमान आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, हीच अपेक्षा होती. पण ताफा न थांबवल्याने आमचा नाईलाज झाला." यावेळी महिलांनी 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने या आंदोलनाकडे गांभीर्याने लक्ष घातले नाही पपरंतुजोपर्यंत प्रत्यक्षात पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शिवसेना उबाठा शेतकरी सेना प्रदेश संघटक (मराठवाडा) वसीम अहमद देशमुख यांनी दिला आहे. या घटनेमुळे हिंगोलीतील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आंदोलन प्रसंगी हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्यासह इतरांनी चोग पोलीस बंदोबस्त ठेवला होता.