हिंगोली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा हिंगोली यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाचा आज सलग तिसरा दिवस आहे.
हिंगोली (Hingoli Strike) : हिंगोली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा हिंगोली यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाचा आज सलग तिसरा दिवस आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले आहे.
या संपात महसूल विभागातील तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांतील वर्ग-3 व वर्ग-4 चे कर्मचारी- अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. भूमी अभिलेख कार्यालय, कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व जिल्हा परिषद येथील दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.
आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनेने खालील प्रमुख मागण्यांसाठी हा बेमुदत संप पुकारला आहे. पदोन्नती, सेवाज्येष्ठता याद्या, बदल्यांचे धोरण याबत शासन निर्णयांची तातडीने अंमलबजावणी व्हावी.
वर्ग-3 व वर्ग-4 संवर्गातील हजारो रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. ही पदे तातडीने भरण्यात यावीत.
जुनी पेन्शन योजना लागू करणे, महागाई भत्ता व इतर प्रलंबित थकबाकी तात्काळ देण्यात यावी. संपाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील व पंचायत समिती स्तरावरील कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. सातबारा उतारे, उत्पन्नाचे दाखले, विविध परवाने यासारखी नागरिकांची दैनंदिन कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या हिंगोली जिल्हा शाखेचे अध्यक्ष दिलीप कदम यांनी बोलताना सांगितले की, “शासनाने आमच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. सेवाविषयक शासन निर्णय, परिपत्रके असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्र आहे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संपामुळे जिल्ह्यातील बहुतांशी विविध विभागातील पत्रव्यवहार ठप्प झाला आहे तसेच जिल्हा कोषागार कार्यालयात सुद्धा देयके सुद्धा स्वीकारली जात नाहीत. एकूणच परिस्थितीमध्ये या संपामुळे बहुतांशी कार्यालयात विस्कळीत आता निर्माण झाली आहे.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच कर्मचाऱ्यांनी मंडप टाकून आंदोलन सुरू ठेवले आहे. प्रशासनाकडून अद्याप चर्चेसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. संप चिघळल्यास नागरिकांची गैरसोय आणखी वाढण्याची शक्यता आहे.