Hingoli Padyatra: हिंगोलीत गोमातेला 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी भव्य पदयात्रा आयोजित केली गेली. हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले.
पदयात्रेत निनादला गोहत्या बंद करा.. चा नारा
हिंगोली (Hingoli Padyatra) : गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा मिळावा आणि त्यांच्या संरक्षण व सन्मानासाठी जनजागृती व्हावी, या उदात्त उद्देशाने सोमवारी हिंगोली शहरात 'गौ सन्मान दिवस' निमित्त भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी एकत्र येत गोवंश रक्षणाचा एल्गार पुकारला. या पदयात्रेची सुरुवात शहरातील ऐतिहासिक बद्रीनारायण मंदिर येथून करण्यात आली. भगवे ध्वज आणि गोमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ही यात्रा जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांनी या पदयात्रेचे स्वागत केले.
पदयात्रेत खुशालचंद महाराज, भगवानदास महाराज, सुभाष पुरी, गोविंदजी स्वामी, महाराज यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, न. प गटनेते श्रीराम बांगर, शशिकांत वडकुते, प्रकाश सोनी, दिपक निमोदिया, जगजीतराज खुराणा, मनिष आखरे, अॅड. मनिष साकळे, राजेंद्र हलवाई, सखाराम धडवाई, कैलाश श्रीनाथ, भाजपा प्रवक्ता विलास गोरे, गोल्डी सोनी, कपिल खंडेलवाल, रत्नाकर महाजन, रजनीश पुरोहीत, बाबा घुगे, संजय खंडेलवाल, प्रशांत गुप्ता, ताराचंद धुत, नामदेव मस्के, कृष्णा अग्रवाल, विजय शिंदे, राहुल बांगर, नवनाथ कानबाळे, अॅड. बांगर, दिपक सावजी, सोनी, साहू, सहभागी झाले होते. पदयात्रेचा समारोप उपविभागीय अधिकारी कार्यालयावर झाला. यावेळी गोमातेचा सन्मान आणि संरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांचे तसेच हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी समाधान घुटकुडे यांना सादर करण्यात आले. गोमातेला 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करावे, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या कार्यक्रमात हिंगोली शहरातील अबालवृद्ध, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोसेवा आणि गोवंश टिकवणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या जनजागृती मोहिमेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पदयात्रेत महिला व युवतीही सहभागी गोमातेला राष्ट्रमाता म्हणुन घोषित करावे. या (Hingoli Padyatra) मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढण्यात आली होती. बद्रिनारायण मंदिरातून निघालेल्या या पदयात्रेत अनेक महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. उन्हाची तीव्रता असली तरी महिला व युवतींनी पदयात्रेत उत्स्फुत सहभाग नोंदविला.