निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत असून तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
औराद शहाजानी (Heat Stroke) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत असून तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या प्रचंड उकाड्याचा फटका सोमवारी एका शेतकऱ्याला बसला असून शेतात काम करत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
औराद शहाजानी परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. दिवसाचे कमाल तापमान 42.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून किमान तापमानही 31.5 अंशांवर गेल्याने रात्रंदिवस नागरिक हैराण झाले आहेत. सततच्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असून शेतकरी, मजूर आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
सोमवारी दुपारनंतर सुमारे चार वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण भंडारे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. यावेळी उन्हाचा तडाखा तीव्र असल्याने अचानक त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. कुटुंबीय व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना औराद शहाजानी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, निलंग्याकडे नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
मयत लक्ष्मण भंडारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत डॉ. मल्लिकार्जुन शंकद यांनी सांगितले की, संबंधित शेतकरी दिवसभर उन्हात शेतीची कामे करत होते. उष्णतेची तीव्रता जास्त असल्याने शरीरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे तीव्र हृदयविकाराचा झटका आला असावा. प्राथमिक पाहता हा उष्माघातामुळे झालेला मृत्यू असल्याचे दिसून येते.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे तसेच शेतकरी व मजुरांनी उन्हात दीर्घकाळ काम टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.