कांदा विक्रीसाठी नाशिकच्या बाजारपेठेकडे जात असताना झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पातुर तालुक्यातील कोसगाव येथील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
(Farmer Death) कांदा विक्रीसाठी नाशिकच्या बाजारपेठेकडे जात असताना झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पातुर तालुक्यातील कोसगाव येथील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिलीप दयाराम करवते (वय ४२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हिंगोली-कळमनुरी मार्गावर घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिलीप करवते हे गुरुवारी (दि. २) आपल्या दोन सहकाऱ्यांसह मालवाहू वाहनाने (क्र. एमएच ३० बीडी ६२७९) कांदा विक्रीसाठी नाशिककडे निघाले होते. त्यांचे वाहन हिंगोलीपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, करवते हे वाहनातून खाली फेकले गेले आणि थेट कंटेनरच्या खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा कंटेनरही घटनास्थळी उलटला.
दिलीप करवते यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. गुरुवारी दुपारी शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कोसगावसह परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शासनाने या शेतकरी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.