Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > मराठवाडा

कोल्हापूरात हृदयद्रावक घटना; अपघातात कुटुंब गमावलेल्या व्यक्तीची त्याच ठिकाणी आत्महत्या

राधानगरी रोडवरील पुईखडी घाटात घटना उघडकीस आली असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


कोल्हापूरात हृदयद्रावक घटना अपघातात कुटुंब गमावलेल्या व्यक्तीची त्याच ठिकाणी आत्महत्या

Family Loss Tragedy |

कोल्हापूर (Family Loss Tragedy) : नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या भीषण बस अपघातात पत्नी आणि दोन लहान मुलांना गमावलेल्या पुण्यातील रहिवासी विराट विठ्ठललाल गौतम (वय ५८, रा. मांजरी बुद्रुक) यांनी जवळपास अडीच वर्षांनी त्याच अपघातस्थळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधानगरी रोडवरील पुईखडी घाटात ही घटना उघडकीस आली असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी काही वाहनचालकांना रस्त्यापासून काही अंतरावर झाडीत एक मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून आला. मृतदेहाजवळ काही पिशव्या व साहित्य आढळल्याने त्यांनी तत्काळ करवीर पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून मृत व्यक्तीची ओळख विराट गौतम अशी पटली. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

पूर्वीचा भीषण अपघात

२३ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी स्लीपर बस (MH12 TV 1658) कोल्हापूर जिल्ह्यातील पिरवाडी–पुईखडी घाटातील वळणावर उलटली होती. या अपघातात विराट गौतम यांच्या पत्नी नीलू गौतम (वय ४३), मुलगी रिद्धिमा (वय १७) आणि मुलगा सार्थक (वय १३) यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेत एकूण २५ प्रवासी होते, त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आणि इतर जखमी झाले होते. विराट हे जखमी अवस्थेत बचावले होते.

नैराश्याचा काळ आणि श्रद्धांजली

अपघातानंतर विराट गौतम यांचे जीवन अत्यंत दुःखदायी बनले होते. पोलिस व नातेवाईकांच्या माहितीनुसार, ते नियमितपणे पिरवाडी घाटात येऊन कुटुंबीयांच्या स्मरणार्थ पुष्पहार अर्पण करत असत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, १० मे रोजीही ते घाटात दिसले होते.

सोशल मीडियावरील भावनिक पोस्ट

मृत्यूपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली होती. “मी कसा जगत आहे हेच मला कळत नाही... माझे जग त्याच क्षणी संपले,” अशा आशयाचे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते. या पोस्टमुळे त्यांच्या मानसिक अवस्थेची कल्पना येत असल्याचे बोलले जात आहे.

तपास सुरू

करवीर पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा केले असून, पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल, सोशल मीडिया पोस्ट आणि त्यांच्या वस्तूंच्या आधारे अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या घटनेने कोल्हापूरसह पुण्यातील त्यांच्या परिचित वर्तुळात शोककळा पसरली असून, अशा प्रसंगातून गेलेल्या व्यक्तींना वेळेत मानसिक आधार आणि समुपदेशन मिळण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Related to this topic: