गडचिरोली जिल्ह्यात मे महिन्यात तापमानाचा पारा धोकादायक पातळीवर पोहोचल्याने प्रशासनाने जिल्ह्यात ‘अतिउष्णतेची लाट’ (Extreme Heat Wave) जाहीर केली आहे.
उष्माघात कक्षांसह जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
गडचिरोली (Extreme Heat Wave) : गडचिरोली जिल्ह्यात मे महिन्यात तापमानाचा पारा धोकादायक पातळीवर पोहोचल्याने प्रशासनाने जिल्ह्यात ‘अतिउष्णतेची लाट’ (Extreme Heat Wave) जाहीर केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका गंभीर बनला असून, जिल्हा आरोग्य विभागाने संपूर्ण आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर ठेवली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी संयुक्त पत्रकाद्वारे नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याचे आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात ‘उष्माघात कक्ष’ सुरू
उष्माघाताच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र ‘उष्माघात कक्ष’ सुरू करण्यात आले आहेत. हे कक्ष २४ तास कार्यरत राहणार असून त्यामध्ये कूलर, एसी, विशेष बेड तसेच ओआरएस, आयव्ही फ्लूइड्स आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.
दुर्गम आणि आदिवासी भागांतील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आशा स्वयंसेविकांमार्फत घराघरात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की,
“दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. उन्हात काम करणाऱ्या नागरिकांनी सतत पाणी पित राहावे. चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.”
तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की,
“अतिउष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते आणि उष्माघाताचा धोका वाढतो. सामान्य रुग्णालय व सर्व ग्रामीण रुग्णालये कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज आहेत.”
उष्माघाताची लक्षणे कोणती?
आरोग्य विभागाने नागरिकांना खालील लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे :
- शरीराचे तापमान अचानक वाढणे
- चक्कर येणे व मळमळ
- असह्य डोकेदुखी
- अत्यधिक तहान लागणे
- लघवीचे प्रमाण कमी होणे
- श्वास घेण्यास त्रास
- हृदयाचे ठोके वाढणे
- भ्रम होणे किंवा बेशुद्ध पडणे
नागरिकांसाठी ‘करा आणि टाळा’
काय करावे?
- डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा
- भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा नारळपाणी प्यावे
- हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत
- दुपारी १२ ते ४ दरम्यान शक्यतो घरात किंवा सावलीत राहावे
- बाहेर पडताना चप्पल किंवा बूट वापरावेत
काय टाळावे?
- कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे करणे
- लहान मुले किंवा पाळीव प्राणी बंद वाहनात ठेवणे
- मद्य, अतिचहा, कॉफी आणि जास्त साखरयुक्त पेये पिणे
- घरगुती उपचारांवर अवलंबून राहणे
उष्माघात ही वैद्यकीय आणीबाणी
आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, उष्माघात ही वैद्यकीय आणीबाणी असून कोणालाही अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयातील उष्माघात कक्षात दाखल करावे. तसेच रुग्णवाहिकेसाठी १०८ किंवा १०२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.