आकाशात सूर्य डोक्यावर आला तरी शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद झालेले नाहीत.
ऊर्जा बचतीच्या आवाहनाला हरताळ; नागरिकांतून संताप व्यक्त
हिंगोली (Energy Saving) : आकाशात सूर्य डोक्यावर आला तरी शहरातील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे बंद झालेले नाहीत. सकाळचे आठ वाजून गेले तरी एलईडी दिव्यांचा उजेड रस्त्यावर पडताना दिसत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून ऊर्जा बचतीच्या सरकारी आवाहनाला केराची टोपली दाखवली जात असल्याची भावना बळावत आहे.
हिंगोली शहरातील रस्त्यांवर नगरपालिकेच्या वतीने विद्युत खांबांवर पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. मात्र भर दिवसा हे पथदिवे सुरूच राहत असल्याचे चित्र दिसत आहे. स्वच्छ निळे आकाश आणि सूर्य पूर्णपणे वर आलेला असतानाही रस्त्याच्या दुभाजकावरील उंच पथदिवे जळत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. एक-दोन नव्हे तर रांगेने असलेले सर्वच दिवे सुरू असल्याचे दिसत असून रस्त्यावर वर्दळही तुरळक असल्याचे चित्र आहे.
नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी “ऊर्जा वाचवा, देश वाचवा” असे आवाहन केले आहे. ‘मिशन लाईफ’ अंतर्गत विजेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थाच याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे.
एकीकडे सामान्य नागरिकांना विजेची बचत करण्याचे धडे दिले जातात, वीज बिलात सवलतीसाठी एलईडी बल्ब वापरण्यास सांगितले जाते. दुसरीकडे हिंगोली नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे हजारो युनिट वीज दररोज वाया जात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
एका एलईडी पथदिव्यामागे साधारण ९० ते १२० वॅट वीज लागते. शहरात असे शेकडो पथदिवे आहेत. दिवसाढवळ्या हे पथदिवे विनाकारण सुरू राहिल्यास दररोज शेकडो युनिट वीज वाया जाते. महिन्याचा हिशोब केला तर हा आकडा लाखोंच्या घरात जातो. या वाया जाणाऱ्या विजेचा आर्थिक भार शेवटी सामान्य करदात्यांच्याच खिशावर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात नागरिकांनी नाराजी व्यक्त करताना, विजेचा अपव्यय होत असताना नगरपालिकेला याचे गांभीर्य नसल्याची भावना व्यक्त केली आहे. विद्युत विभागाचे कर्मचारी वेळेवर पथदिवे बंद करत नसल्याने हा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. स्वयंचलित टायमर किंवा सेन्सर बसवलेले असतील तर ते नादुरुस्त झाले असावेत. अनेकदा देखभाल-दुरुस्तीअभावी ही यंत्रणा बंद पडते. मात्र त्याकडे लक्ष द्यायला नगरपालिका विद्युत विभाग प्रशासनाला वेळ नसल्याची टीका होत आहे.
सध्या देशात विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. उन्हाळ्यामुळे घराघरात कुलर व एसी सुरू आहेत. अशा स्थितीत एकेका युनिटचे महत्त्व वाढले आहे. सरकार कोळशावर आधारित वीजनिर्मिती कमी करून सौर ऊर्जेकडे वळत असताना अशी उधळपट्टी करणे म्हणजे पर्यावरणाचीही हानी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नगरपालिका प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन पथदिव्यांची वेळेत चालू-बंद होणारी यंत्रणा दुरुस्त करावी, जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करून ही ऊर्जा गळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगर परिषद प्रशासनाने ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ न करता प्रत्यक्ष कृतीतून ऊर्जा बचतीचा आदर्श घालून द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.