पातूर तालुक्यातील सावरगाव तांड्यात लो-व्होल्टेज आणि पहाडशिंगीतील धोकादायक वीज वाहिनीच्या समस्येमुळे ग्रामस्थांनी महावितरणविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पातूर (Electricity Issue) : पातूर तालुक्यातील सावरगाव तांडा वस्तीतील अपुऱ्या विद्युत दाबाची समस्या आणि पहाडशिंगी येथील धोकादायक वीज वाहिनी हटवण्याबाबत महावितरणकडून होणाऱ्या टाळाटाळाच्या निषेधार्थ आता ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी अकोला, पालकमंत्री आकाश फुंडकर आणि पातूर तहसीलदारांना निवेदन देऊन २२ मे रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सावरगाव येथील तांडा वस्तीतील नागरिक मागील दहा वर्षांपासून लो-व्होल्टेजच्या गंभीर समस्येला तोंड देत आहेत. कडाक्याच्या उन्हाळ्यात विद्युत दाब अत्यंत कमी राहत असल्याने घरातील पंखे, पाण्याचे पंप व इतर आवश्यक उपकरणे चालत नाहीत. रात्रीच्या वेळीही विजेचा दाब अस्थिर राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे पहाडशिंगी येथील सेवालाल महाराज मंदिरावरून आणि लोकवस्तीच्या घरांवरून गेलेली वीज वाहिनी अत्यंत धोकादायक ठरत असून ती दुसऱ्या बाजूने नेण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात आली आहे.
या संदर्भात महावितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व असंतोष निर्माण झाला आहे. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वेळबद्ध आराखडा जाहीर करावा आणि संबंधित निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. २१ मे पर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास २२ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको व उपोषणासारख्या लोकशाही मार्गाचा अवलंब करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निलेश कापकर यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.