शनिवारी पहाटे पावणे नऊ च्या सुमारास झालेल्या भूकंपाने सबंध हिंगोली जिल्हा हादरला.
रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेची नोंद; अलीकडच्या काळातील सर्वात मोठा हादरा
हिंगोली (Earthquake News) : शनिवारी पहाटे पावणे नऊ च्या सुमारास झालेल्या भूकंपाने सबंध हिंगोली जिल्हा हादरला. आजच्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ एवढी होती. जिल्ह्यात केंद्र असलेल्या भूकंपाची ही आजपर्यंतची सर्वोच्च तीव्रतेची नोंद आहे. या भूकंपाचे हादरे मराठवाडा व विदर्भातही जाणवले.
शनिवारी ११ एप्रिल रोजी पहाटे ८. ४५ वाजता अचानक जमिनी खालून प्रचंड गडगडाट ऐकू आला. या सोबतच जमीन हादरल्याची जाणीव झाली. तळमजल्यावर राहणार्या किंवा खुल्या मैदानात असणार्यांपेक्षा उंच इमारतीत राहणार्यांना भूकंपाचा हादरा बसला. पहाटेची वेळ असल्याने जागे असलेल्या लोकांना हे जाणवले, परंतु झोपेत असणार्यांना फारसे काही कळाले नाही. ज्यांना भूकंपाचा अंदाज आला त्यांनी घराबाहेर निघून खुल्या मैदानात आडोसा घेतला. भूकंपामुळे कोठेही जनहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची नोंद सायंकाळपर्यंत प्रशासनाकडे आली नव्हती. पांगरा शिंदे गावात काही घरांच्या भिंतीना तडे गेल्याचे समजते. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ एवढी नोंदविली गेली. भूकंपाचे केंद्र वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावानजीक असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र च्या वेबसाईटवर नोंदविले गेले. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली दहा किलोमीटर असल्याची नोंदही या केंद्रा ने नमूद केली आहे. शंभर ते दीडशे किलोमीटरच्या परिघात या भूकंपाचे हादरे बसले असून हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात तीव्रतेने भूकंपाची जाणीव झाली.
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र असलेले हे आजपर्यंतचे सर्वात अधिक तीव्रतेचे भूकंप होते. यापूर्वी १० जुलै २०२४ रोजी ४.५ तीव्रतेचा भूकंप कळमनुरी तालुक्यात रामेश्वर तांडा नजिक असलेल्या केंद्रातून झाला होता. मागील महिन्यात २१ मार्च रोजी सुद्धा जिल्ह्याला भूकंपाचा हादरा बसला होता. एका वर्षापूर्वी २१ मार्च २०२४ रोजी दहा मिनिटांच्या अंतरात जिल्ह्याला भूकंपाचे दोन हादरे बसले होते. यातील पहिला हादरा पहाटे ६.०८ मिनिटांनी बसला होता, जो ४.५ तीव्रतेचा होता. त्यानंतर लगेच ६ वाजून १९ मिनिटांनी बसलेला दुसरा हादरा रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचा होता. याशिवाय २५ ऑक्टोबर २०२५ व २० नोव्हेंबर २०२३ या दोन भूकंपामध्ये ३.४ व ३.९ तीव्रतेची नोंद झाली आहे. २०१८ नंतर रिश्टर स्केलवर चार पेक्षा अधिक तीव्रतेचे आजपर्यंत एकूण चार हादरे बसले आहेत. त्यातील ११ एप्रिल २०२६ चा हादरा सर्वाधिक ४.७ तीव्रतेचा होता. वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये सतत जमिनीखालून आवाज येत असल्याच्या अनेक तक्रारी नेहमी येत असतात याबाबत संबंधित विभागाच्या पथकांनी वेळोवेळी भेट देऊन माहिती वरिष्ठांना दिलेली आहे.