वर्धा जिल्ह्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश मिळाले असून १२२८९/१२२९० नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसला वर्धा जंक्शन येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे.
वर्धा (Duronto Express) : वर्धा जिल्ह्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश मिळाले असून १२२८९/१२२९० नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसला वर्धा जंक्शन येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे. येत्या १५ एप्रिल २०२६ पासून हा थांबा सुरू होणार असून प्रवाशांसाठी आरक्षण सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत हा निर्णय घेतला आहे. यामुळे वर्धा व परिसरातील प्रवाशांना मुंबईसाठी जलद आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.
या थांब्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकजभाऊ भोयर तसेच माजी खासदार रामदास तडस यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. दरम्यान, गाडी क्रमांक १२२९० (नागपूर-मुंबई) साठी वर्धा जंक्शनला स्वतंत्र आरक्षित कोटाही मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 1AC साठी २, 2AC साठी ६, 3AC साठी ६४ आणि स्लीपरसाठी २० बर्थ उपलब्ध असतील. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे अधिक सोपे होणार आहे. या रेल्वे गाडीचे आरक्षण सुरू झाले असून, आरक्षण केंद्रांवर तसेच RailOne या ॲपवर तिकीट विक्री सुरू आहे.
थांबा सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या ZRUCC सदस्य तथा भाजप जिल्हा सचिव प्रणव जोशी यांनी दिली असून, या सुविधेमुळे वर्धा जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.