शहरातील बेसा परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नागपूर (Drunk Driving) : शहरातील बेसा परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या बँक व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. विजय भगवान सावरकर (वय ५३) आणि त्यांची पत्नी सुरेखा विजय सावरकर (वय ४८, रा. हरीहरनगर, बेलतरोडी) यांचा यात दुर्दैवी अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सावरकर दाम्पत्य त्यांच्या जावयाच्या नितीन सुरेश कळंबे (वय ३०) मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी दिघोरीतील आराधनानगर येथे गेले होते. बुधवारी नितीन यांच्या मुलीचा वाढदिवस सोहळा आराधनानगर येथील आहान सेलिब्रेशन हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या १२ वाजता च्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. याचवेळी बेसा चौक ते पुरुषोत्तम बाजार चौकदरम्यान समोरून येणारी कार अचानक त्यांच्या वाहनावर धडकली.
ही कार पंकज डेकाटे (४७, रा. न्यू नरसाळा, हुडकेश्वर) चालवत होता. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या क्षणी त्याचे लक्ष मोबाईलकडे गेले आणि वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि सावरकर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपी डेकाटे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.