राज्यातील गाजलेल्या काही प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अकोला (Dowry Harassment) : राज्यातील गाजलेल्या काही प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या कथित छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. जुने शहर परिसरातील भावना घाटोळे यांनी आयुष्य संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भावना यांचा विवाह सुमारे पाच वर्षांपूर्वी विशाल घाटोळे यांच्याशी झाला होता. त्यांना अवघे १४ महिन्यांचे मूल आहे. लग्नानंतर सुरुवातीपासूनच सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी दबाव, टोमणे तसेच मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “आम्ही श्रीमंत आहोत, तुमच्याकडून काहीच मिळाले नाही,” अशा शब्दांत तिचा वारंवार अवमान केला जात होता, असेही तिच्या वडिलांनी सांगितले.
घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे ९ ते ९.३० दरम्यान भावनाने आपल्या वडिलांना फोन करून ‘मला इथून घेऊन जा, मला खूप त्रास देत आहेत,’ अशी आर्त हाक दिली होती. मात्र, काही तासांतच पतीकडून ‘तुमची मुलगी गळफास घेतली’ अशी माहिती मिळाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
यानंतर भावनाचे वडील विठ्ठल मलवळकर यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे पोलिसांकडून त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे अकोला शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.