११ एप्रिल शनिवार रोजी सकाळी सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात पांगरा शिंदे गावात केंद्रबिंदू असून, ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.
हिंगोली (Disaster Management) : ११ एप्रिल शनिवार रोजी सकाळी सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात पांगरा शिंदे गावात केंद्रबिंदू असून, ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती भूकंप मापन केंद्र, नांदेड येथून प्राप्त झाली आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के शेजारील जिल्ह्यातील काही भागांमध्येही जाणवले आहेत.
सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. तरीही नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
नागरिकांनी अफवा, खोटे फोन कॉल किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी :
नागरिकांनी शांत राहावे व घाबरू नये. घरामध्ये असल्यास मजबूत टेबल, पलंग किंवा भिंतीच्या कोपर्याजवळ आसरा घ्यावा. डोक्याचे संरक्षण करावे. भूकंप थांबल्यानंतर सुरक्षितपणे मोकळ्या जागेत जावे. शक्य असल्यास गॅस व वीज पुरवठा बंद करावा. अधिकृत सूचनांचे पालन करावे. तसेच घाईगडबडीत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये. लिफ्टचा वापर करू नये. अफवा पसरवू नये किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. विजेच्या तारा, इमारतीतील भेगा किंवा कमकुवत संरचनांच्या जवळ जाऊ नये. अनावश्यक फोन करून नेटवर्क व्यस्त ठेवू नये.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे (९४०५४०८९३९) यांच्याशी व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भूकंपाच्या हादर्याने काही ठिकाणी नुकसान झाले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रशासकीय यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सोबतच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनीही नुकसानीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भूकंपामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागात काही घरांना तडा गेला असून काही ठिकाणी भिंतीही कोसळल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.